सांगली : आगामी निवडणुकीत (Election 2024) मतदरांनी बॅलेट पेपरची (Ballot paper) मागणी केली पाहिजे, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी केलं आहे. ते सांगलीच्या मिरजमध्ये बोलत होते. तसंच नरेंद्र मोदी (PM Modi)  हे देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर आहेत. त्यांना ओळखलं पाहिजे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असं मतही त्यांनी नोंदवलं.


प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'ईव्हीएम'बाबत चौकशी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. खरोखरच त्या मशिनमध्ये बिघाड आहे. 431 उमेदवार असतील तर बॅलेटवर मतदान घ्यावे लागते. त्यामुळे 431 उमेदवार उभे केले पाहिजे. या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरची लोकांनी मागणी केली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर आहेत. त्यांना ओळखले पाहिजे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत बोलताना व्यक्त केले. आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाशी चर्चा करून त्यांची मतेही जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी येथील मीरासाहेब दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आंबेडकर बोलत होते. 


राज्यात जातीय तेढ निर्माण केले जात आहे : आंबेडकर


भाजप सरकारकडून भीती दाखविली जाते. निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम दंगल होईल की काय हे सांगता येत नाही. ओबीसी विरुद्ध मराठा भांडण सुरू झाले आहे. धनगर विरुद्ध आदिवासी भांडण यांनी लावले आहे, असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीनवर निवडणुका न करता बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका होण्यासाठी त्यांनी विविध पर्याय सांगितले, जनतेतून जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर  शासनाला पर्याय उरणार नाही असेही त्यांनी सांगितले.


6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते: आंबेडकर


आंबेडकर म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. चार राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे.  ओबीसींनी सतर्क राहा.  


हे ही वाचा :