Bacchu kadu : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन  माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मोठ्या सख्येनं कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत.  


या आहेत प्रमुख मागण्या


बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावरील निर्यात शुल्क हटविणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत संत्रा फळ पिकाचे वयोमर्यादेनुसार कोणतीही दोन वर्षात आंतर मशागतीसाठी अनुदान द्यावे, सोबतच सोयाबीन आणि मागील संत्रा फळाचे अनुदान मिळावे याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. 


विदर्भातील मुख्य आर्थीक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांपैकी संत्रा हे एक फळपिक आहे. परंतू, बदलते हवामान आणि दरवर्षी होणारी फळगळती त्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीचा सामना करत आहेत. त्यातच आता बांग्लादेश सरकारनं संत्रा पिकावर आयात शुल्क वाढवल्याने संत्रा निर्यात जवळपास बंद झाली आहे. विदर्भातील संत्र्याकरीता बांगलादेश हा एकमेव आयात करणारा देश आहे. संत्रानिर्यात झाल्यास स्थानीक बाजारपेठेत शेतकऱ्यांना संत्र्याला बऱ्यापैकी दर मिळतात परंतु आता जवळपास निर्यात बंद झाल्याने स्थानीक बाजारपेठेत सुध्दा संत्र्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहे. हवामानातील बदल दरवर्षी वाढती फळगळ, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याकरीता उस उत्पादक शेतकन्यांच्या साखर निर्यतीला देत असलेल्या निर्यातीकरीता अनुदानाच्या धर्तीवर संत्रा निर्यातीकरीता अनुदान दयावे.

हीच मागणी घेऊन आज प्रहार संघटनेने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची चांगलीच बाचाबाची झाली. अखेर पाच जणांना आतमध्ये सोडण्यात आले पण जिल्हाधिकारी यांनी आमच्याशी उद्धतपणेने वागणून दिल्याचं आरोप प्रहार आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलतांना केला.