Lok Sabha Election 2024देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम केव्हाच वाजले असून सर्वत्र राजकीय पक्षाची धामधूम सुरू आहे. तर कुठे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच राज्यात महायुतीतलाच घटक पक्ष असलेला 'प्रहार पक्ष' आज आपल्या वेगवेगळ्या भूमिका जाहीर करतांना दिसत आहे. विषेश म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळच असताना युती आणि आघाड्यांकडून वेगवेगळया प्रक्रिया जोमाने सुरु आहेत. त्यात प्रहार पक्षानं अमरावती लोकसभा मतदारसंघात आपली वेगळी भूमिका घेतली आहे. आता प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यातही (Akola Lok Sabha Constituency)आपली भूमिका जाहीर करणार आहे.


दरम्यान, उद्या 7 एप्रिल रोजी 11 वाजताच्या सुमारास प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) नेतृत्वात हॉटेल सेंटर प्लाझा इथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रहार आपल्या पुढील भूमिकेसंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यामुळ प्रहार पक्ष अकोला लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाला पाठिंबा देणार, की आपली काही वेगळी भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या बाबतचा खुलासाही खुद्द बच्चू कडू उद्या अकोल्यात पत्रकार परिषद घेत जाहीर करणार आहेत. 


नेमका कोणाला देणार पाठिंबा?


आमदार बच्चू कडूंनी अमरावती येथे भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका आधीचं जाहीर केली असून आपला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. दरम्यान, महायुतीत राहूनही अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत ही राणा यांना धडा शिकवण्‍यासाठी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे असले तरी ही लढत केवळ नवनीत राणा पुरती आहे की, महाविकास आघाडीला नुकसान पोहचविण्‍यासाठी आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, अकोल्यात प्रहार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


अकोल्यात प्रहारची ताकद आहे तरी किती?


मागील काही काळ बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहे. यादरम्यान त्यांचे अकोला जिल्ह्यात अनेकांशी जवळीक संबंध आहे. बच्चू कडूंना मानणारा एक मोठा वर्गही अकोल्यात असल्याचे बोलले जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातल्या अकोट विधानसभा मतदारसंघात प्रहारकडून 2019 च्या निवडणुकीत तुषार पुंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तेव्हा 23 हजार 934 इतकं मतदान प्रहारला मिळालं होते. याशिवाय प्रहारनं जिल्हा परिषेदेतही खातं उघडलं होतं. त्यामुळे प्रहार पक्षाचा पाठिंबा नेमका कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि भाजपकडून महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आता प्रहारचे बच्चू कडू उद्या कोणाला पाठिंबा जाहिर करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या