रायगड : कर्जतमध्ये काल पार पडलेल्या अजित पवार (Ajit Pawar)  गटाच्या शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रफुल पटेलांनी गौप्यस्फोट केला आहे. 2004  सालीच राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा निर्णय झाला होता. तर 16-16-16 च्या फॉर्म्युलानुसार लोकसभा लढवण्याचा निर्णय झाला होता असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे.  तर राष्ट्रवादीसोबत युती झाल्यास दिल्लीतील महत्त्व कमी होईल असं गोपीनाथ मुंडेंना (Gopinath Munde) वाटलं आणि त्यांनी युतीची माहिती बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) दिली. तेव्हा बाळासाहेबांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आणि युती फिस्कटली, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे.


पटेल म्हणाले, 2004 साली राष्ट्रवादी नुकतीच जन्माला आली होती. त्यावेळी 16-16 -16 करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या घरी मीटिंग झाली होती. स्वतः प्रमोद महाजन माझ्या घरी होते. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार हे झालं होतं. त्यावेळीं गोपीनाथ मुंढे यांना लक्षात आलं की आपलं दिल्लीतल महत्त्व कमी होईल त्यामुळे त्यांनी बळासाहेब ठाकरे यांना माहिती लीक केली.  त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी आडवी तिडवी टीका केली आणि होणारी युती होऊ शकली नाही.  


शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत, ही खंत कायम मनात : पटेल


अजित पवार मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची इच्छा होती. नरसिंहरावांना हटवण्यासाठी आम्ही पुर्णपणे प्रयत्न केले.  परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले. सहा महिने पूर्ण होतं नाहीत तोच केसरीने देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले सर्वांनी विनंती केली तुम्हीं केसरी यांना हटवा. त्यावेळी मला देवेगौडा यांचा फोन आला. मी देवेगौडा यांच्या घरी गेलो त्यावेळी ते म्हणाले, मी राजीनामा देतो फक्त केसरीला हटवा आणि शरद पवार यांनी भूमीका घ्यावी. मी शरद पवार यांना जाऊन सांगितलं आणि सांगितलं आपल्याला मोठी संधी आहे. परंतु 15 मिनिटांत त्यांनी बैठक संपवली आणि नंतर बोलू असं म्हणत सुवर्णसंधी गमावली. काय झालं मलाही कळलं नाही त्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत ही खंत माझ्या मनात आहे.


पहाटेचा शपथविधी का झाला?


2014 साली गडकरींसोबत आमची बैठक झाली. यावेळी पवार यांनी ऐनवेळी भाजप सोबत जायचे नाही हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक फिस्कटली होती. शरद पवार हे बैठकीतून निघून गेले. पवार साहेब जाताना मला अजित पवार यांना सांगून गेले तुम्ही काही निर्णय घ्या. त्यानंतर अजित पवार पहाटेच्या शपथविधीसाठी भाजपसोबत गेले. असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. 


आमची राजकीय भूमिका शरद पवार यांच्या विरोधात


माझे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक वाद नाहीत पण आमची राजकीय भूमिका शरद पवार यांच्या विरोधात आहे. अजित पवार यांचे शरद पवारांसोबत चांगले आणि गोड संबंध होते. मात्र जवळ नव्हते कारण मी शरद पवार यांच्याजवळ होतो.  त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत मी गेलो त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की अजित पवार यांच्यासोबत कसं काय? अनेकांना वाटलं यांचं आतून सख्य आहे. आपण अजित पवार यांच्या सोबत जाताना राजकीय भुमिका घेतली होती. आता आपण भुमिका घेतली आहे दादा एके दादा. दादांसोबत जाण्याचा आता निर्णय घेतला आहे मी शरद पवार सोबत होतो आता कायमस्वरूपी अजित पवार यांच्या सोबत आहे, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं.



मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1986 मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत. काँग्रेस मध्ये अधिकृतरित्या काम करत असताना शरद पवार यांनी जे काही चढ उतार पाहिले याबाबत दिलीप वळसे पाटील अजित पवार यांना माहिती आहे. शरद पवार यांनी त्यावेळीं त्यावेळच्या परिस्थितीनुसार जाण्याचा निर्णय घेतला. आज अजित पवार यांनी निर्णय घेतल आपल्याला त्यासोबत जायचं आहे, असेही पटेल म्हणाले.