सिंधुदुर्ग : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम तळकोकणात जाणवू लागला आहे. तळकोकणात उष्म्याची तीव्रता वाढली असून आज ढगाळ वातावरणही होतं. दुपारी कडक ऊन, दिवसभर कमालीचा उष्मा अशी स्थिती तळकोकणात आहे. मात्र यामुळे आंबा आणि इतर फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


सिंधुदुर्गात पाच-सहा दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. त्यात आता ढगाळ वातावरणाची भर पडली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेशमार्गे महाराष्ट्रातील इतर भागांसह कोकणामध्ये हे वारे वाहून येत आहे.


या वातावरण बदलाचा परिणाम थेट आंबा पिकावर होत आहे. आंब्याच्या झाडावर असलेली फळे आणि वाऱ्याचा वेग यामुळे मोठ्या प्रमाणात फळ गळती होण्याची शक्यता आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे ऐन हंगामात असलेल्या आंबा, काजू, कोकम, करवंद, जाभूळ या पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे.


आंबा, काजूची फळ गळती होत आहे, तर जांभूळ पिकावर जास्त प्रभाव या हवामान बदलाचा दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 40 ते 50 टक्के जांभूळ पिक घटलेलं पाहायला मिळत आहे. कोकणातील रानमेव्यावरही या सतत बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम दिसून येत आहे.