मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सादर केला आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला.


राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.


.... तर संजय राठोड यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू: महंत जितेंद्र महाराज


संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!" पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने घेतला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं.


पोहरादवीच्या महंतानी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलं होतं. त्या पत्रात संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांवर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत असताना आता पोहरादेवीमध्ये तीन महंतांची बैठक घेतली होती.


Pooja Chavan Death Case | राजीनामा देतो, चौकशी झाल्यावर मंजूर करा: संजय राठोडांची मुख्यमंत्र्याकडे विनवणी