अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी संपामागं राजकारण असल्याचा आरोप केला आहे.


मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी संप मागं घेतला. मात्र, पुन्हा त्याच दिवशी शेतकऱ्यांनी संपाचा निर्णय घेतल्यानं यामध्ये राजकारण असल्याचं राम शिंदेंनी म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये ते शिवार संवाद यात्रेच्या नियोजन बैठकीत बोलत होते.

राजकारण न करता शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आवाहनही राम शिंदे यांनी विरोधकांना केलं. शिवाय, सरकार चर्चेला तयार असून मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. या संदर्भात मी पण चर्चेला तयार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही राम शिंदे म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक धोरण राबवत आहे. शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सरकार शेतकऱ्यांना सक्षम करत आहे. मात्र, मुद्दे नसल्यानं विरोधक सरकारवर बेछूट आरोप करत असल्याची टीका राम शिंदे यांनी केला आहे.