मेट्रो 4 या वडाळा ते कासारवडवली प्रकल्पाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात होणाऱ्या प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर खंडपीठाने याचिकेतील काही मुद्यांबाबत गुरूवारी तोंडी निरीक्षण नोंदविले.
देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. लोक नोकरी-धंद्यासाठी महानगरांकडे वळू लागलेत. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणा-यांची संख्यापण वाढू लागली आहे. पण त्यांनी केवळ रेल्वेवरच विसंबून राहायचे का?, वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येणारे प्रस्तावित प्रकल्प थांबले तर त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत. तो भारदेखील करभरणा करणाऱ्या नागरिकांनाचा सोसावा लागतो. राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीने भूमिका घेत असतात, पण अशा प्रकरणांमध्ये केवळ संवेदनशीलतेनं विचार होता कामा नये. न्यायालयांचे काम कायद्याच्या निकषांवर चालतं, असेही यावेळी खंडपीठाने स्पष्ट केलं. याचिकेत ठाणे महापालिकेसह, मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएला प्रतिवादी करण्यात आले आहे.