Manipur Violence:  ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार 52 दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी मणिपूरच्या जनतेची विचारपूस करण्यास जात असताना त्यांना रोखले जाणे हे मोदींच्या हुकुमशाही कारभाराचा नमुना आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.  


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, राहुल गांधी यांना मणिपूरमध्ये रोखल्याबद्दल भाजपा सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मणिपूरची जनता केंद्र सरकारच्या मदतीची आस लावून बसली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत असल्याची सडकून टीका पटोले यांनी केली. 


काँग्रेस नेते राहुल गांधी हे हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या लोकांचे दुःख जाणून घेण्यासाठी गेले होते. राहुल गांधी यांना रस्ते मार्गाने जाण्यास सुरुवातीला परवानगी दिली. मणिपूरची जनता हजारोंच्या संख्येने राहुल गांधींचे स्वागत करण्यास उभी होती. राहुल गांधी यांची लोकप्रियता पाहून भाजपा सरकार घाबरले आणि त्यांचा ताफा अडवून त्यांना परत पाठवले असल्याचा आरोप पटोले यांनी केला. 


राहुल गांधींना परत पाठवून स्थानिक लोकांवर पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.  मणिपुरी जनता मोठ्या संख्येने राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेली होती. पण भाजप सरकारने त्यांना लोकांना भेटू दिले नाही. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे हे पुन्हा स्पष्ट झाले. राहुल गांधी प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश घेऊन मणिपूर येथे पोहचले होते पण मोदी सरकारला मणिपूर शांत व्हावे असे वाटत नसावे म्हणूनच राहुल गांधींना रोखण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने केला.


मणिपूरच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. पोलीस स्टेशनवर हल्ले होऊन शस्त्रास्त्र पळवली जात आहेत. प्रार्थना स्थळे जाळली जात आहेत. जीवित व वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे पण मनमानी, लहरी स्वभावाचे केंद्र सरकार मात्र मणिपूरला अग्निकांडात होरपळत सोडून भाषणबाजी, इव्हेंटबाजी व जाहिरातबाजीत मग्न आहे. मणिपूरच्या लोकांना राहुल गांधींना भेटू न देण्याच्या भाजपा सरकारल्या भूमिकेला केवळ मणिपूरच नाही तर देशातील जनताही माफ करणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले.


राहुल गांधींचा ताफा रोखला 


राहुल गांधी यांना इम्फाळ (Imphal) विमानतळासमोरील बिष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आलं.  इम्फाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधी यांचा ताफा थांबवण्यात आला आहे. परिसरातील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं असल्याची माहिती देण्यात आली. 


दोन दिवसांचा मणिपूर दौरा 


राहुल गांधी दोन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करतील. शिवाय या दौऱ्यात राहुल गांधी मदत शिबिरांनाही भेट देणार आहेत. यासोबतच त्यांचा इम्फाळ आणि चुरचंदपूर इथल्या नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रम आहे.