मुंबई : राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचं एका पत्राच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना कळवले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांची आज चौकशी होणार होती. 


राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी समन्स बजावला होतं. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा बुधवारी जबाब नोंदवला जाणार होता. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडलं गेल्याची माहिती मिळत आहे. 


माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ऑफिशल सिक्रेट्स अॅक्टचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 


काय आहे प्रकरण? 
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. फडणवीस यांनी असा आरोप केला होता की, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलीस अधिकारी इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.


रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली होती. फोन टॅपिंग झालं तेव्हा सीताराम कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. 


दरम्यान, मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात दहशतवादासारख्या कृत्यांना आळा घालण्यासाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यासाठीच रश्मी शुक्ला यांनी परवानगी मागितली, जी त्यांना देण्यात आली. परंतु ऑफिशल सिक्रेट्स अॅक्ट्स आणि भारतीय टेलीग्राफ कायद्यातील तरतुदींना डावलत रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर केला असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे याप्रकरणी आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार आहे. त्यासंदर्भात मुंबई सायबर पोलिसांनी त्यांना समन्सही बजावलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :