परळी (बीड) : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांची चर्चा फक्त परळी येथूनच होतील, सरकारने इतर लोकांशी बोलू नये, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.


आज राज्यव्यापी बंदने वातावरण ढवळून निघाले आहे. यावर तोडगा निघत नाही. परळी हे आंदोलनाचे केंद्र आहे. सरकारने परळी येथील समाज बांधवाशी चर्चेने यावर तोडगा काढावा, असे आवाहन आबासाहेब पाटील यांनी केले.

तसेच, सरकार जर इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल, तर आम्हास ते मान्य होणार नाही. जी चर्चा करावयाची आहे, ती येथूनच होईल, असे स्पष्ट मत परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी मांडली.

परळी हे मराठा क्रांती मोर्चाचं केंद्र मानलं जातं. आजही परळीत आयोजित ठिय्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.
काय आहेत मागण्या?

1. राज्य सरकार करत असलेल्या मेगा भरती स्थगित करावी. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.

2. अशा प्रकारचे आश्वासन सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.

3. कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.

महाराष्ट्र बंद


मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज  24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. तर उद्या मुंबई बंद करण्यात येणार आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत.  बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या आज बंद आहेत.  काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैद्राबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. उस्मानाबादमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय.

बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन

अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परत येत आहेत, त्यामुळे बस अडवू नका, बसचं नुकसान करु नये, असे आवाहन सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. तसेच,प्रशासनासह सर्व पक्षीय नेते आणि मराठा मोर्चा समन्वयकांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आणि असं टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन केलं आहे.

सरकारकडून मदत जाहीर

दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून उपयोग होणार नाही. मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत. 10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय? काही पेड लोक या आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे – चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात एका मराठा आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. काकासाहेब शिंदे याला मच्छीमारांनी नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत काकासाहेब शिंदेच्या भावानं घेतली आहे.

काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

औरंगाबादमधील मराठा आंदोलनकर्त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुठलीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे

औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे संभाजीराजे म्हणाले.

तसेच, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”