पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चाललेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात 9 वारकरी जखमी झाले आहेत. त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मांगेगाव (ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद) येथील दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास दिंडीचा टेम्पो शिक्रापूर येथील चाकण रोडवरील जातेगाव फाट्याजवळ शिक्रापूरकडून चाकणच्या दिशेने जात होता. यावेळी एका हॉटेलेसमोरुन बाहेर येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक टेम्पोला बसली. यात वारकऱ्यांच्या टेम्पोतील नऊ वारकरी जखमी झाले. यातील चार वारकरी गंभीर असल्याची माहिती आहे.  जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.