पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur By Election) या दोन तरुण नेत्यांमध्ये होणार आहे. उद्या दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशातच आज भाजप आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 


राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे कला शाखेतील पदवीधर असून केवळ 34व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भगीरथ हे गेली 10 वर्ष वडिलांना राजकीय कामकाजात मोठी मदत करत होते. त्यामुळे त्यांना निवडणुकांचा चांगला अनुभव आहे. गेली 10 वर्षे ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक असून वडिलांच्या निधनानंतर त्यांची साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भगीरथ भालके यांनी गेल्या वेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कासेगाव गटातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. 
     
भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे भगीरथ भालके यांच्या तुलनेत थोडे जास्त अनुभवी आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. अवताडे हे 45 वर्षांचे असून सिव्हिल इंजिनियर आहेत. तसे अवताडे यांना कोणती राजकीय पार्श्वभूमी नसली तरी तरुणांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. अवताडे हे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. शेकडो किलोमीटरचे रस्ते बांधायची कामे त्यांच्या कंपनीकडे आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव होत असताना अवताडे यांच्या मतांमध्ये चांगली वाढ झालेली आहे. अशातच 80 हजार मतांचा गठ्ठा असणारे परिचारक यांचेवर अवताडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे अवताडे यांच्यासाठी तशी ही निवडणूक सोपी बनली आहे. 


पंढरपूर मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकींमध्ये परिचारक आणि अवताडे यांच्या मतविभाजनातून भालके निवडून येत होते. भगीरथ भालके यांना गेल्या निवडणुकीत 89 हजार मते मिळाली होती. तर परिचारक यांना 76 हजार तर अवताडे यांना 54 हजार मतं मिळाली होती. भाजपने अवताडे आणि परिचारक यांच्यातून एक उमेदवार दिल्याने या दोघांच्या बाजूने पडणारी मतं राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा खूप जास्त आहेत. अशातच वीज तोडणी आणि इतर मुद्द्यांवर मतदारांत असलेली नाराजी अवताडे यांच्या बाजूने झुकू शकणारी आहे. मात्र भारत भालके यांचे झालेले नुकतेच अकाली निधन आणि यातून मिळणारी सहानुभूती याचा फायदा भगीरथ भालके यांना मिळणार आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्या बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी राष्ट्रवादीला आधी या बंडखोरांना थांबवावे लागणार आहे. उद्या राष्ट्रवादीचा अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील तर भाजपचा अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात येणार आहेत. उद्या अजून किती बंडखोर अर्ज भरणार याकडे दोन्ही पक्षांचं लक्ष आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pandharpur By Election : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे मैदानात