Palghar Latest News : गुजरातमधील ओखा बंदरातील मासेमारी करणाऱ्या दोन बोटींसह 16 खलाशांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं. यामधील सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुषच पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात गेल्याने पालघरमधील सात कुटुंब चिंतेत आहेत.  


डहाणूतील अस्वाली गावातील सहा तर सोगवे येथील एका खलाशाला पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतलं आहे .  रोजगारासाठी ओखा येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या या कामगारांना समुद्रातूनच पाकिस्तानच्या मेरिटाईम विभागाने ताब्यात घेतलं. त्यामुळे या खलशांची कुटुंब सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहेत. कुटुंबातील कमावता कर्ता पुरुषच पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याने ही कुटुंब सध्या मरणयातना सोसत आहेत.  कुटुंबाची घडी चालवणारा कुटुंबप्रमुख पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याच ऐकताच या कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली . घराची आर्थिक घडी चालवणारा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने घर खर्च आणि मुलांचा खर्च करायचा कसा असा गंभीर प्रश्न या महिलांसमोर उभा राहिलाय. 


नवश्या भीमरा , विजय नागवंशी , सरीत उंबरसाडा , जयराम साळकर , कृष्णा बुजड , विनोद कोल , उधऱ्या पाडवी अशी या सात खलाशींची नावं आहेत. महिनाभरापूर्वीच हे ओखा बंदरातील एका मासेमारी बोटीवर रोजगारासाठी गेले होते. पालघर मधील डहाणू ,  तलासरी , विक्रमगड या दुर्गम भागातील शेकडो कामगार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने गुजरातकडे धाव घेतात. यातील अनेक कामगार हे आजही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. यात असलेला धोका लक्षात येऊनही रोजगारासाठी येथील अनेक कुटुंब प्रमुख मासेमारीसाठी बोटींवर खलाशी म्हणून जातात. त्यामुळे सरकारने आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या खलासांची सुटका करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे . 


गुजरातमधील ओखा बंदरातील मासेमारी करणाऱ्या दोन बोटी समुद्रातून पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतल्या. या बोटीवर असलेल्या 16 खलाशांपैकी सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराच्या शोधात गेलेल्या या खलाशांना पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतलं असून सध्या पालघर मधील त्यांचे कुटुंबीय मोठ्या संकटात सापडले आहेत . या सर्वच कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने पुढे कुटुंब चालवायचं कसं असा गंभीर प्रश्न या कुटुंबातील महिलांसमोर सध्या उभा आहे . 


समुद्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईत पालघर मधील सात खलाशांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या खलासांमध्ये कृष्णा भुजडचा समावेश असून त्याचं कुटुंब मोठ्या अडचणीत सापडल आहे. कृष्णा भुजळ हा या घरातील एकमेव कर्ता पुरुष होय. आजी अपंग तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कृष्णा गुजरात मधील ओखा बंदरातील एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला गेला . मात्र सध्या कृष्णा पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याने कृष्णाचा कुटुंब ही मरण यातना सोसतंय. कृष्णाला मिळणाऱ्या पगारातूनच कृष्णाचा कुटुंब चालत होता, मात्र आता हे कुटुंब चालवायचं कसं असा गंभीर प्रश्न या दोघींसमोर उभा राहिलाय. त्यामुळे सरकारने पाठपुरावा करून त्यांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी कृष्णाचे कुटुंबीय करत आहेत.