Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची (Leaders of opposition parties) बैठक होणार आहे. सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेससह (Congress) इतर पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने आपण काँग्रेस आणि भाजपला (BJP) समान अंतरावर ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आजच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


EVM : आजच्या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्यावर चर्चा  होणार


आज सायकांळी सहा वाजता दिल्लीच शरद पवारांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विविध मुद्यांसह ईव्हीएमच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे. निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम (EVM) यंत्रणा अचूक आणि कार्यक्षम असणं आवश्यक असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, चिप बसवलेल्या कोणत्याही मशीनला हॅक करता येणं शक्य आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.  


Loksabha Election: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होण्याची शक्यता


दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न सुरु केले आहेत, तर काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी शक्य नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची काय भूमिका हवी यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


PM Narendra Modi : विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र 


गेल्या काही दिवसापूर्वी देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी (Opposition Leaders) पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi)  पत्र लिहिलं होतं. या पत्रातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला होता. राज्यपालांमुळं (Governor) केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करुन भाजप सोडून इतर राजकीय पक्षांना सातत्यानं गोत्यात आणल्याचा आरोप पत्रातून केला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सीबीआय (CBI) आणि ईडीचा (ED) गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या कारवाईमुळं तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचंही विरोधकांनी म्हटलं होतं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या:


भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू; देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र