गडचिरोली: वनरक्षक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोलीमधील धानोरा तालुक्यातील मुरूमगाव वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्राधिकारी भगवान आत्राम याच्यावर मुरुमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


 

१३ मे रोजी वनपरिक्षेत्राधिकारी भगवान आत्राम हे पीडित वनरक्षक महिलेला घेऊन मुरूमगाव वन परिक्षेत्रांतील येरमागड-मरमा जंगलात गस्तीवर गेले होते. संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरएफओ भगवान आत्राम याने त्या महिलेचा विनयभंग केला. याबाबतची तक्रार वनरक्षक महिलेने मंगळवारी मुरूमगाव पोलिस मदत केंद्रात केली.

 

पोलिसांनी रात्री उशिरा आरएफओ भगवान आत्राम याच्यावर कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांत तक्रार करु नये, यासाठी पीडित महिलेवर दबाव आणण्यात आला होता. मात्र वनरक्षक संघटनेने हे प्रकरण गांभीर्यांने घेतल्यानं पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

 

वादग्रस्त भगवान आत्राम हे यापूर्वीही अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेकडून आत्राम यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली असून उपवनसंरक्षक गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले आहे.