मुंबई: जगाच्या इतिहासाच्या आणि भूगोलाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना असलेल्या बर्लिनच्या भिंतीचा पाडाव 3 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता. ही जागतिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती. तसेच देशात जनता पक्षाचं सरकार सत्तेत आल्यानंतर इंदिरा गांधी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आजच्याच दिवशी अटक करण्यात आली होती. जाणून घेऊन आजचा दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे. 


भारत आणि जगभरात आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे, 


1831- म्हैसूर संस्थानवर ब्रिटिशांचा कब्जा 


18 व्या शतकात हैदर अलीने म्हैसूर जिंकले आणि त्यावर नियंत्रण मिळवलं. 1782 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान याने 1799 पर्यत राज्य केलं. 1799 साली श्रीरंगपट्टनमच्या लढाईत ब्रिटिशांनी टिपू सुलतानचा पराभव केला आणि म्हैसूर संस्थानावर विजय मिळवला आणि या ठिकाणी नावापुरता राजा बसवला. परंतु या ठिकाणी किचकट राजकीय गुंतागुंतीमुळे अस्थिरता कायम राहिली. त्यामुळे 3 ऑक्टोबर 1831 रोजी ब्रिटिशांनी या राजाला गादीवरुन हटवलं आणि इंग्रजी कमिशनरची नियुक्ती केली. 


1923- कादिंबिनी गांगुली यांचे निधन 


भारतातील पहिल्या महिला डॉक्टर्सपैकी एक असलेल्या कादिंबिनी गांगुली (Kadambini Ganguly) यांचे 3 ऑक्टोबर 1923 रोजी निधन झालं होतं. त्यांनी मॉडर्न मेडिसिनमध्ये पदवी प्राप्त केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषण देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. 


1952- ब्रिटनच्या पहिल्या अणुबाँबची चाचणी 


दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा आणि नागासाकी अणुबाँब हल्ल्यानंतर आपल्याकडेही अशा प्रकारचे आण्विक हत्यार असावं अशी लालसा विकसित देशांमध्ये लागली आणि त्यानंतर यासाठी स्पर्धा सुरू झाली. 3 ऑक्टोबर 1952 रोजी ब्रिटनने ऑपरेशन हरिकेन अंतर्गत आपल्या पहिल्या अणुबाँबची चाचणी केली. 


1952- ब्रिटनमध्ये चहा सेवनाच्या मर्यादेवरचं नियंत्रण हटवलं 


ब्रिटनमध्ये 1940 साली चहाच्या सेवनावर मर्यादा आणल्या गेल्या. त्यामुळे लोकांना मर्यादित प्रमाणात चहाचे सेवन करावं लागत होतं. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर त्यावरील नियंत्रण हटवलं गेलं. 3 ऑक्टोबर 1952 रोजी ही बंदी हटवण्यात आली. त्यामुळे ब्रिटिशांना आपल्या मर्जीप्रमाणे हवं तितकं चहाचं सेवन करता येणं शक्य झालं. 


1977- इंदिरा गांधी यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन अटक 


देशात आणीबाणी लावल्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी (Indira Gandhi)  यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या मोरारजी देसाई सरकारने 3 ऑक्टोबर 1977 रोजी इंदिरा गांधी यांना अटक केली. एखाद्या माजी पंतप्रधानाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ होती. इंदिरा गांधी यांच्यासोबत इतर चार मंत्र्यांनाही तुरुंगात जावं लागलं. 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीत दोन कंपन्यांकडून जबरदस्तीने 104 जीप घेण्याचा आरोप इंदिरा गांधी यांच्यावर करण्यात आला होता. तसचे फ्रान्सच्या एका  पेट्रोलियम कंपनीला 1.34 कोटी रुपयांचे कंत्राट देताना त्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता. नंतर इंदिरा गांधी यांची सुटका झाली. 


1990- जगाचा इतिहास आणि भूगोल बदलणाऱ्या बर्लिनच्या भिंतीचा पाडाव (Berlin Wall Fall)


दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. या दोस्त राष्ट्रांनी मग जर्मनीचे दोन भागात विभाजन केलं. जर्मनीचा पश्चिम भाग युरोपकडे तर पूर्व भाग सोव्हिएत रशियाकडे गेला. 1961 साली सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांनी पूर्व जर्मनीतील लोकांचं वाढतं स्थलांतर थांबवण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनी दरम्यान, बर्लिन (Berlin Wall) येथे एक भिंत बांधली. 


सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालील देशांमध्ये क्रांतीचे वारे वाहू लागल्यानंतर पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकीकरणावर चर्चा होऊ लागली. आधीच असंतोषी असलेल्या नागरिकांनी यासाठी आंदोलनाला सुरुवात केली. 3 ऑक्टोबर 1990 रोजी दोन्ही बाजूच्या लोकांनी ही भिंत पाडली आणि चार दशकांच्या संघर्षानंतर जर्मनीचे पुन्हा एकदा एकीकरण झालं. बर्लिनच्या या भिंतीच्या पाडावामुळे जगाचा भूगोल आणि इतिहासही बदलला. 


2021- लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन करणाऱ्या आठ शेतकऱ्यांचा मृत्यू 


उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी या ठिकाणी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा, आशिष मिश्रा याने गाडी घातली होती. त्यानंतर या भागात हिंसाचाराची घटना घडली होती.