मुंबई: आज सुपरफास्ट, बुलेट ट्रेनचे युग असेल, परंतु भारतीय रेल्वेच्या इतिहासात 16 एप्रिलचे विशेष महत्त्व आहे आणि नेहमीच राहील. आजच्याच दिवशी, 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली ट्रेन धावली. तसेच आजच्याच दिवशी जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिनचा जन्म झाला. यासह आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, त्या सविस्तरपणे पाहू,


1853 : देशातील पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे दरम्यान धावली 


भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे जाळे असणारी रेल्वे आहे. या भारतीय रेल्वेची सुरुवात ही आजच्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी झाली. आजच्या दिवशी भारतातील पहिली रेल्वे ही बोरी बंदर ते ठाणे ( Bori Bunder Mumbai and Thane) दरम्यान 34 किमी अंतरावर धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या साहिब, सिंध आणि सुलतान (Sahib, Sindh and Sultan) नावाच्या तीन वाफेच्या इंजिनांच्या सहाय्याने ही रेल्वे धावली आणि भारतात रेल्वे सेवेचा पाया रचला गेला. भारतातील पहिली रेल्वे ही 1,676 मिमी (5 फूट 6 इंच) रुंद आणि 14 डबे असणारी होती. भारतातील ही पहिली रेल्वे 400 प्रवाशांना घेऊन बोरी बंदरहून दुपारी 3.30 वाजता निघाली. ती संध्याकाळी 4.45 वाजता ठाण्यात पोहोचली. म्हणजेच हा प्रवास या रेल्वेने एक तास 15 मिनिटांत पूर्ण केला.


मे 1854 मध्ये मुंबई-ठाणे मार्गाचा विस्तार कल्याणपर्यंत करण्यात आला तेव्हा ठाणे खाडीवर भारतातील पहिला रेल्वे पूल असलेले ठाणे मार्गे बांधण्यात आले. पूर्व भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन 15 ऑगस्ट 1854 रोजी कोलकाता जवळील हावडा ते हुगळीपर्यंत 39 किमी (24 मैल) धावली. दक्षिण भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन 1 जुलै 1856 रोजी रॉयपुरम-वेसारापाडी (मद्रास) ते वालाजारोड (अर्कोट) पर्यंत 97 किमी (60 मैल) धावली.


1889 : विनोदी अभिनेता, दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन यांचा जन्म


सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन म्हणजेच चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) एक इंग्रजी विनोदकार आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चार्ली चॅप्लिन हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. ते अमेरिकन सिनेमाच्या सुरुवातीच्या ते मिड-क्लासिकल हॉलीवूड युगातील एक महत्त्वपूर्ण चित्रपट निर्माता, संगीतकार होते. चॅप्लिन हे मूक चित्रपट युगातील सर्वात सर्जनशील आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी अभिनय, दिग्दर्शन, पटकथा, निर्मिती केली. ब्रिटनमधील व्हिक्टोरियन रंगमंचावर आणि संगीत हॉलवरील बाल कलाकारापासून ते वयाच्या 88 व्या वर्षी जवळजवळ मृत्यू होईपर्यंत त्यांनी आयुष्यातील 75 वर्षे मनोरंजन विश्वाची सेवा केली. 


1922 : मुळशी सत्याग्रहाला सुरुवात 


देशाच्या आणि राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा लढा असलेल्या मुळशी सत्याग्रहाला 16 एप्रिल 1922 रोजी सुरुवात झाली. मुंबईच्या वाढत्या विजेची गरज भागवण्यासाठी, 1918 सालच्या औद्योगिक आयोगाच्या शिफारशीनंतर टाटा समूहाने मुळशी पट्ट्यात निळा आणि मुळा नदीवर धरण बांधायला सुरुवात केली. यामुळे 52 गावं बाधित होणार होती. लोकांनी त्या विरोधात आंदोलन सुरु केलं. विनायक भुस्कुटे आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 16 एप्रिल 1922, राम नवमीच्या दिवशी या आंदोलनाला सुरुवात झाली. 


1945: जर्मन जहाज बुडाले आणि 7000 जणांचा मृत्यू


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, शेवटी शेवटी जर्मनीची माघार सुरू झाली आणि दोस्त राष्ट्रांचा विजय निश्चित झाला. या दरम्यान 16 एप्रिल 1945 रोजी सोव्हिएत पाणबुडीमुळे जर्मन निर्वासित जहाज बुडाले आणि 7000 लोकांचा मृत्यू झाला.


1964: ब्रिटनमधील प्रसिद्ध गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या 'द ग्रेट ट्रेन रॉबरी'साठी 12 जणांना 307 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.


1976: ब्रिटनचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांचा राजीनामा 


ब्रिटनचे आठ वर्षे पंतप्रधान भूषवलेले आणि मजूर पक्षाचे नेते हेरॉल्ड विल्सन यांनी अचानक राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झाले.


1988: उत्तर इराकमधील हलबजा या कुर्दी लोकवस्तीच्या शहरावर झालेल्या गॅस हल्ल्यात हजारो लोक मारले गेले, तर अनेक जण त्याच्या परिणामांमुळे आजारी पडले.


1988: पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनचा शक्तिशाली नेता खलील अल वझीर उर्फ ​​अबू जिहाद याची ट्युनिशियातील ट्युनिस येथे त्याच्या घरी हत्या करण्यात आली.


1990: बिहारची राजधानी पाटणाजवळ गर्दीने भरलेल्या पॅसेंजर ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये झालेल्या स्फोटात किमान 80 लोक ठार आणि 65 जण जखमी झाले.


2020: जगभरात कोरोना विषाणूच्या महामारीमुळे 20,83,820 हून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली. त्यापैकी 1,37,500 लोकांचा मृत्यू झाला.