औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' सुरु असताना तीन नगरसेवक उभं न राहिल्यानं गोंधळ उडाला. या दोन्ही नगरसेवकांवर महापौरांनी एका दिवसासाठी निलंबनाची कारवाई केलीय.


महापालिकेत वंदे मातरम् सुरू असताना एमआयएमचे दोन आणि काँग्रेसचा एक असे तीन नगरसेवक उभे राहिले नाहीत. यावरुन शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांसमोरील वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली आणि तिन्ही नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली.

विशेष म्हणजे, याप्रसंगी सेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याचंही समजतं आहे. यावेळी एमआयएमचे नगरसेवक शेख जफर यांनी महापालिका सभागृहात तोडफोड केली.

त्यामुळे महापालिकेतील या अभूतपूर्व गोंधळानंतर एआयएमचे नगरसेवक शेख जफर याचं एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तसेच जफरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट करताना, राष्ट्रगीताचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच मतीन यांच्या कृतीबद्दल त्यांना जाब विचारणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.