अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सोमवारी (26 ऑक्टोबर) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली आहे. ते अकोला येथे अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित ऑनलाईन 'धम्मचक्र प्रवर्तन दिना'च्या कार्यक्रमात बोलत होते. कोरोनामुळे हा कार्यक्रम यावेळी सार्वजनिकपणे न घेता अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी प्रतिकात्मक घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांचं मुंबईवरुन लाईव्ह भाषण झालं. दरवर्षी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणाऱ्या या सभेत आंबेडकर आपली राजकीय दिशा आणि विचार स्पष्ट करत असतात.


अकोल्यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भिक्कू संघाचे अध्यक्ष बी. संघपाल, प्रा.अंजली आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप-बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पांडुरंग, राजेंद्र पातोडे यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर कठोर टीका
या भाषणात अनेक मुद्द्यांवरुन प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. देशात कोरोनाची स्थिती गंभीर होण्यासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचं आंबेडकर म्हणाले. मोदींनी स्वत:चा 'टीआरपी' वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देशात आणत 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम केल्याचं ते म्हणाले. येथूनच देशात कोरोनाचा फैलाव व्हायला सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केंद्र सरकारवर केला आहे. मोदींनी देशवासियांना कोरोनाची भीती दाखवली. मोदींनी कोरोनाशी लढायचं केलेलं आवाहन ठीक होतं. मात्र, हे करताना सहा महिन्यांपेक्षा अधिक दीर्घकालीन लॉकडॉऊनची आवश्यकता होती का?, असा सवाल आंबेडकरांनी पंतप्रधानांना केला.


संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे
लॉकडॉऊन'चा धागा पकडत आंबेडकरांनी संघ-भाजपवरही जोरदार टीका केली. कोरोनानंतर लॉकडॉऊन लावल्याने लोकांचे होत हाल होते. असे होत असताना संघप्रमुख डॉ. मोहन भागवतंनी पंतप्रधानांना परिस्थितीची जाणीव करुन दिलीच नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. देशभरात लोकांचे हाल होत असताना संघ आणि भाजपने बघ्याची भूमिका घेतल्याचं आंबेडकर म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमध्ये माणसाला किंमत नाही. सोबतच आरएसएस-भाजपच्या शासनात माणूस आणि माणुसकीला किंमत नसल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावला.


लॉकडॉऊन' काळात मोदींनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल थांबवण्यासाठी देशभरात 'कम्युनिटी किचन'ची संकल्पना का राबविली नाही?, असा प्रश्नही आंबेडकरांनी केंद्र सरकारला विचारला.


पंतप्रधान मोदी 56 इंच छातीची ताकद दाखवणार का?
प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या तिन्ही कृषी विधेयकांवरही जोरदार टीका केली आहे. किमान आधारभूत मूल्याबाबत या विधेयकात काहीच ठोस तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या विधेयकाला काही राज्यांनी टोकाचा विरोध केला आहे. कृषी विधेयकात संशोधन करणार पंजाब आणि कृषी विधेयक नाकारणाऱ्या राज्य सरकारांविरोधात 56 इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 356 वापरत बरखास्त करणार का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.



केंद्राचे खाजगीकरण धोरण अंबानी-अदाणी धार्जिणे
केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या क्षेत्राचं खाजगीकरण चालवल्याचं धोरण चुकीचं असल्याचं आंबेडकर म्हणाले. केंद्रातील कंगाल सरकार देशाची संपत्ती विकायला निघाल्याचं ते म्हणाले. हे खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकार अंबानी, अदाणींसाठी राबवत असल्याचा त्यांनी आरोप केला. यामुळे देशाची वाटचाल 'बनाना रिपब्लिक'कडे तर सुरु झाली नाही ना?, असा सवाल त्यांनी केला आहे.


पंतप्रधानांवर टीका करताना जीभ पुन्हा घसरली 
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ पून्हा घसरली. सोलापूरातील आपत्तीजनक वक्तव्याचा त्यांनी आजच्या भाषणातही पुनरुच्चार केला आहे. दारुडा नवरा जसा कोणत्याही कारणासाठी बायकोला मारतो, पंतप्रधान मोदीही तसेच प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला वेठीस धरीत असल्याचं आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान मोदी या दारुड्या नवऱ्यासारखेच असल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधानांची तुलना बायकोला मारणाऱ्या दारुड्या नवऱ्याशी केली आहे. सोलापुरातील या वक्तव्यानंतर त्याचे मोठे पडसाद उमटले होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार करत त्यांनाच 'दारुडा' म्हटले होते.


एक तासाच्या भाषणात राज्य सरकारवर फक्त तीन मिनिटं बोलले आंबेडकर
मुख्यमंत्र्यांना दुष्काळग्रस्तांना भेटण्यासाठी विनंती करावी लागते. सरकारने आपादग्रस्तांना मायेची सावली द्यावी, असं आंबेडकर भाषणाच्या शेवटी म्हणाले. राज्यातील सरकार तीन पायांचं असून सरकारचे तिन्ही पाय वेगवेगळे असल्याचा टोला त्यांनी लगावला. सरकारने माणसाचं जीवन सामान्य कधी करणार हे स्पष्ट करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


आजच्या संपूर्ण भाषणात प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं. आपल्या 1 तास 48 सेकंदाच्या भाषणात फक्त शेवटचे तीन मिनिटं त्यांनी राज्य सरकारवर भाष्य केलं. एरव्ही शरद पवार आणि काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी संपूर्ण भाषणात मोदी विरोधाच्या अजेंड्यावरचा फोकस हटू दिला नाही. आंबेडकरांनी या भूमिकेतून राज्य सरकारसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनुल्लेखानं मारलं की, त्यांच्याप्रती ते सहानुभूतीच्या भूमिकेत आहेत का?, याची चर्चा होत आहे.


संबंधित बातम्या


पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी आणि निर्णय घ्यावा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन


'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका