सोलापूर : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे गावागावात सध्या गरमा गरम चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीत सोलापूरातलं एक गाव असं आहे, जिथे 1979 सालापासून निवडणूकच झालेली नाही.


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव... गेल्या 40 वर्षात एकदाही गावात निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार गावातले जेष्ठ मंडळी ठरवतात. प्रत्येक प्रभागाचा मतदारसंघाच्या आरक्षण रचनेप्रमाणे उमेदवार निश्चित होतो. ना कसली स्पर्धा..ना कुठले वाद..

या गावात 1979 सालापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. निवडणुकीचा खर्च वाचवून बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्यावर विकासकामाचं दडपण ठेवण्याची मळेगावची प्रथा आहे.

गेल्या तीस वर्षात पोलीस ठाण्यात एकही तक्रार नाही

मळेगावात निवडणुका होत नसल्याने पोलीस ठाण्यात गेल्या तीन दशकात एकही तक्रार दाखल झाली नाही. गावातली भांडण मिटवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. जी सगळ्यांना बंधनकारक असते. एखाद्या न्यायव्यवस्थेसारखं गावातल्या तंटामुक्ती समितीचं कामकाजाच स्वरूप आहे.

बिनविरोध निवडणुकीची प्रथा

निवडणुका या अशांततेला कारणीभूत ठरत असल्याने या गावात आजपर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. निवडणुका जाहीर झाल्या की गावकऱ्यांची बैठक होते. प्रत्येक प्रभागातला एक उमेदवार सर्वानुमते ठरवला जातो. तोच उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतो. विरोधात कुठलाही उमेदवारी अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवसच विजयाच्या मिरवणुकीने समाप्त होतो.

निवडणुका म्हटलं की, लाखोंचा खर्च आणि भांडण-तंटे, आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणि एकमेकांवर चिखलफेक ही आलीच. त्यातूनच गावातला संघर्ष आणि वाद निर्माण होतात. रक्ताच्या नात्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवलेली उदाहरणं गावोगावी पाहायला मिळतात. मळेगाव मात्र त्याला अपवाद आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून या गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. त्यामुळे गाव सुखी आणि शांत आहे.

संबंधित बातमी : साडे सात हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!