रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कारला एसटीनं मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावाजवळ चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.


गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मुंबईत घेऊन येणाऱ्या एसटीला हा अपघात झाला. लांजा-मुंबई एसटीची थांबलेल्या इनोव्हा कारला मागून धडक बसली. ही कार गोव्यातील असून वळंजू कुटूंब मुंबईत जात होते; मात्र असुर्डे येथे गाडी रोडच्या बाजूला थांबलेली असताना लांज्यातून बोरीवलीच्या दिशेने चाकरमन्याना घेऊन जाणा-या एसटीच्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कारला मागून जोरदार धडक दिली.

यामध्ये कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर चारजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सावर्डे येथील डेरवण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर एसटी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.