पंढरपूर : सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरु आहे. परंतु एक गाव असंही आहे जिथे ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही. 1955 मध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून इथे तब्बल 66 वर्षे निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. या गावाचं नाव आहे निमगाव, जे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आहे.


1955 सालापासून 2021 पर्यंत या गावाने आजवर एकही ग्रामपंचायत निवडणूक पाहिलेली नाही. आजवर या गावाने तालुक्याला तीन आमदार आणि पाच सभापती दिले आहेत. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे हे निमगाव. या गावाने आजवर एकही ग्रामपंचायत निवडणूक पाहिलेली नाही. निमगाव इथे 1955 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि तेव्हापासून जवळपास 66 वर्षे या गावात कधीही ग्रामपंचायत निवडणूक न होता, आजवर बिनविरोध निवडीची प्रक्रिया अतिशय एकोप्याने चालत आलेली आहे. आज तिसऱ्या पिढीतही ही परंपरा अशाच रितीने पाळली जाते हे विशेष.


या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 66 वर्षात या गावातून एकही प्रकरणपोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं नाही. साधारण साडेतीन हजार लोकवस्तीचे हे गाव काही वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत होते . दुसऱ्या भाषेत बोलायचे झाल्यास इथे तुळशीच्या लग्नालाही ऊस मिळणे मुश्किल असताना आता या गावातून तब्बल 1 लाख टनापेक्षा जास्त ऊस साखर कारखान्याला जातो. याशिवाय 300 एकरावरील केळी आणि रोज दहा हजार लिटर दूध संकलित करणाऱ्या या गावाचे वार्षिक उत्पन्न 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मजुरीला जाणाऱ्या या गावात आज घरटी दुचाकी आणि चार चाकीगाडी असल्याने येथील मजूरही थेट गाडी उडवत मजुरीला जातात. हे सर्व शक्य झालंय गावाच्या एकीने. या गावात शेतीला पाणी पुरवठा करणारा साठवण तलाव आहे, ज्यामुळे गाव 100 टक्के बागायत झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरचे RO पाणी प्रत्येक घराला मिळते. गावात थेट बालगोपालापासून यूपीएससी आणि एमपीएससीपर्यंत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायतीकडून वायफाय सुविधा, भुयारी गटार योजना, पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटचे रस्ते, दवाखाना, शाळा, ज्युनियर कॉलेज सगळ्या सोयी ग्रामपंचायत पुरवते. फक्त तुम्हाला या गावात आल्यावर एकही हॉटेल अथवा पण टपरी मात्र शोधून मिळणार नाही. कारण या गावात या सुविधा गेल्या 66 वर्षात कधी गावकऱ्यांनी येऊच दिल्या नाहीत.



ग्रामीण विकासाचा पाया अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायत आदर्श कारभाराचे एक जिवंत उदाहरण म्हणून निमगावने आपली ओळख बनवली आहे ते गावाच्या एकीमधून. वास्तविक निवडणूक म्हणजे गावगाड्यातील जिवंतपणा असे सांगितले जाते. मात्र निवडणूक आणि त्यातून होणारे विसंवाद, बेबनाव आणि पातळी घसरत चाललेल्या राजकारणापेक्षा एकोप्याने जपलेला आपलेपणा याचीच गोडी निमगाव ग्रामस्थांना आहे . म्हणूनच तिसऱ्या पिढीतही बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा आजही कायम आहे. गावात दोन आमदार असले तरी गावाचा कारभार गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याने चालतो. सर्व जाती धर्मातील ज्येष्ठ मंडळी निवडणुकीपूर्वी एकत्र बसतात आणि प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार ठरवतात. या मंडळींनी ठरवलेल्या उमेदवारालाही माहित नसते की यंदा आपण सरपंच किंवा सदस्य होणार आहे. मात्र एकदा या ज्येष्ठांनी उमेदवार यादी जाहीर केला की ते ग्रामस्थ जाऊन अर्ज भरतात आणि पहिल्याच दिवशी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचा निकाल लागतो.


सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणापासून जवळ वसलेल माढा तालुक्यातील निमगाव हे गाव. या गावाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दिवंगत आमदार विठ्ठलभाऊ शिंदे यांनी 1955 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तीच परंपरा आज 2021 मध्ये सुद्धा आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांनी कायम ठेवली आहे. यामुळेच शेतीसोबत या गावातील प्रत्येक घरातील एक माणूस नोकरी करतो. एक दुधाचा किंवा दुसरा व्यवसाय करतो तर उरलेला शेतीत उत्पन्न घेतो. यामुळेच या गावात कधी वादविवाद तंटे होत नाहीत आणि झाले तर गावातील ज्येष्ठ मंडळींच्या तोडग्यानंतर सर्वच वाद गावातच मिटल्याने येथील ग्रामस्थांनी कधीही पोलीस स्टेशनची पायरी चढलेली नाही .


निमागावची वैशिष्ट्ये


- 1955 साली स्थापनेपासून गेली 66 वर्षे ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा अखंड सुरु


- गावाच्या एकीमुळे पाण्याचा थेंब नसलेल्या गावात आज 50 कोटींची उलाढाल होते


- गावात वादच होत नसल्याने गेल्या 6 वर्षात पोलीस स्टेशनला एकही केसच कधी गेली नाही


- गावात एकही हॉटेल अथवा टपरी नाही, त्यामुळे येथे प्रत्येकजण कामात गुंतलेला असतो