सांगली : विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. काही तथाकथित लोक लोकशाहीच्या गळचेपीबद्दल राज्यपालांना पत्र देत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. देवा पाण्यात घालून बसले होते. मात्र त्यांच्या प्रश्नांना निवडणूक कार्यक्रमामुळे उत्तर मिळाले आहे, असा अप्रत्यक्ष टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.


राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजकीय संघर्ष सुरू होता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आता उद्धव ठाकरे यांची आमदारपदी निवड होणे गरजेचं आहे. तसं न झाल्यास उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात येण्याची चिन्हे होती. तर सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कोरोना विरोधात लढत असताना उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून निर्माण झालेला पेच प्रसंग आता दूर झाला आहे.


महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक


केंद्रीय निवडणूक आयोगाने 21 मे रोजी राज्यातील 9 विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्य संपुष्टात आलं आहे. तर जाहीर झालेल्या या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांनी समाधान व्यक्त केले आहे. निर्माण झालेले पेच सोडवण्यासाठी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची मागणी केली होती. सोशल डिस्टन्स आणि कोरोनाची खबरदारी घेऊन निवडणुका पार पाडल्या जातील, असं आश्वासन देऊन विनंती करण्यात आली होती, असं जयंत पाटील म्हणाले.


विधानपरिषद निवडणूक | कुणाला किती जागा? 9 जागांसाठी अशी आहेत आकड्यांची गणितं


महाराष्ट्र कोरोना विरोधात लढत असताना, महाराष्ट्रात काही लोक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच काही तथाकथित लोकांनी लोकशाहीच्या गळचेपी बद्दल राज्यपालांना पत्र दिले होते. आणि काही लोक देव पाण्यात घालून बसले होते. मात्र त्यांच्या प्रश्नांना निवडणूक कार्यक्रमामुळे उत्तर मिळाले आहे. विधानपरिषदेची निवडणूक तिन्ही पक्ष मिळून लढवतील. तसेच कोरोना विरोधातील लढाई अधिक जोमाने लढवत, भविष्यात महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार काम करेल,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.