मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना आज 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे त्यांच्या वकीलामार्फत हजर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे हे उद्या स्वतः हजर राहतात की वकीलामार्फत आपली बाजू मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. या संदर्भात खडसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकलेला नाही. दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने खडसे हे कालपासूनच मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे.


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीची नोटीस मिळाल्याचं सांगितलं होतं. 30 डिसेंबरला हजर राहण्याचा ईडीची समन्स मला मिळाली आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. या आधीही माझ्या या घटनेची चौकशी झाली आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी पुरवले आहे. आता देखील सहकार्य करेल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.


भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही. आज मला काहीही सांगायचं नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.


ईडीची नोटीस मिळाल्याची एकनाथ खडसेंची कबुली, 30 डिसेंबरला हजर राहण्याची समन्स


एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते.


खडसे यांनी जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती.


भाजपच्या विरोधात जातील त्यांच्यामागे 'ईडी' लावली जाते - जयंत पाटील


'खडसेंना दिलेल्या ईडीच्या नोटीसीची भीती नाही'


दरम्यान, खडसेंना आलेल्या ईडीच्या नोटिसीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.