मुंबई : अजित पवार गटाचे (Ajit Pawar) काही आमदार शरद पवार गटात परत जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्या चर्चांना आता बळ मिळणारी घटना घडली आहे. अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांचा समावेश असल्याने अजित पवार गटामध्ये चिंतेचं वातावरण आहे. 


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटाच्या संपर्कात अजित पवारांचे आमदार असल्याची चर्चा होती. तशा प्रकारचा दावा जयंत पाटील आणि आमदार रोहित पवारांकडून करण्यात येत होता. 


शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधीमंडळाच्या कामकाजासाठी आले होते. त्याचवेळी एका कार्यालयात अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीवेळी जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि अनिल देशमुख हेदेखील उपस्थित होते अशी माहिती आहे. 


नाशिकचे दोन आमदार स्वगृही परतणार?


जयंत पाटलांची भेट घेणाऱ्या आमदारांपैकी दोन आमदार हे नाशिक भागातले असल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी कांदा प्रश्न पेटला होता, त्याचा फटका महायुतीला बसला आणि अनेकांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ही परिस्थिती पाहता  नाशिकमधील दोन आमदारांनी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. 


आमदार रोहित पवार हे यावर प्रतिक्रिया देता ना म्हणाले, जयंत पाटील हे अनुभवी नेते आहेत. कधी कुठले कार्ड काढायचं हे त्यांना माहिती आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. शरद पवार हे महायुतीच्या नेत्यांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलं आहे. जे कुणी चांगले असतील त्यांचे स्वागत आहे. पण ज्या आमदारांनी उन्माद केला, लोकभावनेच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यावर शरद पवार, जयंत पाटील निर्णय घेतील.


अजित पवारांना भाजप संपवतंय


भाजप लोकनेत्यांना संपवतात, तीच भूमिका अजित पवारांच्या बाबत घेतली जात आहे असं सांगत रोहित पवार म्हणाले की, आता अजित पवारांना जाणूनबुजून बाजूला केले जात आहे. अजित पवारांच्या आमदारांना फक्त शरद पवारांची मतं खाण्यासाठी उभे करण्याची भूमिका भाजपची दिसतेय. पण आमदार तितके खुळे नाहीत. त्यामुळे भाजपसोबत राहिले तर अजित पवारांना 20 ते 22 जागा मिळतील. जर स्वतंत्र लढले तर सर्व ठिकाणी त्यांचे आमदार उभे राहतील, पण ते फक्त मतं खाण्यासाठी असतील, त्यांच्यातील कुणीही निवडून येणार नाही.