मुंबई :  एनसीबी ही देशातील एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही त्यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक कळत नाही असा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


नवाब मलिक म्हणाले की, "मुंबईत 8 जानेवारी रोजी एका व्हॉट्सअपवरुन काही माध्यमांना एक मेसेज करण्यात आला होता. आपण एक रेड करुन ड्रग्ज संदर्भात कारवाई करत असल्याचं त्यामध्ये आधीच सांगण्यात आलं होतं. महत्वाचं म्हणजे या माहितीच्या खाली समीर वानखेडे यांचं नाव होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली." 


नवाब मलिक पुढे म्हणाले की, "12 जानेवारीला रात्री 10 वाजता माझे जावाई, समीर खान यांना ईडीचं समन्स आलं आणि 13 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं. याची माहिती माध्यमांना आधीच देण्यात आली होती. तसा मेसेज त्याच नंबरवरुन करण्यात आला होता. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आलं."


या बनावट प्रकरणात माझ्या जावयाला आठ महिने तुरुंगात रहावं लागलं तर मुलीला धक्का सहन करावा लागला असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही. माझ्या जावयाकडे 200 किलो गांजा नव्हताच, तो हर्बल तंबाखू असल्याचं स्पष्ट झालं आहे असंही ते म्हणाले. 


दरम्यान, नवाब मलिकांनी गेल्या काही दिवसात सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. 


क्रूझ पार्टी छापेमारीत NCB ने अटक केलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला यांना एनसीबीने काय सोडलं? असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या आधी केला होता. या तिघांना भाजप नेत्यांनी फोन केल्यानंतर सोडण्यात आलं का याचा खुलासा एनसीबीच्या समीर वानखेडे यांनी करावं असं आव्हान नवाब मलिक यांनी केलं होतं. आपण करत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


एनसीबीने अटक केलेल्या तीन लोकांना भाजप नेत्यांच्या दबावामुळे सोडण्यात आलं का? समीर वानखेडे आणि दिल्लीतील तसेच राज्यातील भाजप नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची चौकशी करण्यात यावी. समीर वानखेडे तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावे. ही सर्व  छापेमारी बनावट आहे. या प्रकरणी केंद्राने एक समितीची स्थापना करावी आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली होती.