Jayant Patil : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढलाय. मंत्रीपद मिळाले नाही, तर आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच मंत्रीमंडळ विस्तार थांबला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार करु असं म्हटलं तर ती घोषणा खरी मानली जाते असेही पाटील म्हणाले.


मंत्रीपद मिळाले नाही, तर आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच मंत्री मंडळ विस्तार थांबला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. विस्तार केला आणि नाराज आमदार बाहेर पडले तर संख्याबळ कमी होईल आणि शिंदे गट अडचणीत येऊ शकतो, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार थांबला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं. मंत्रीमंडळ विस्तार होणार हे जाहीर करायचा अधिकार फडणवीसांना नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मात्र, फडणवीसांनी आपले मत मांडलं असावं असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.


नवीन काही सरकारकडून काम होत नाही


प्रकल्प महाराष्ट्रच्या बाहेर जात आहेत. अशा स्थितीत बेरोजगार असणाऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. आम्ही जी पोलीस भरती जाहीर केली तीच भरती हे सरकार जाहीर करत आहे. नवीन काही सरकारकडून काम होत नाही. जे सरकारमध्ये आहेत, त्यांची उद्योग टिकवण्याची जबाबदारी आहे. पण या सत्तेतील लोकांकडून निराशा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत लोक निवडून देतील का? याची शाश्वती शिंदे आणि भाजपला वाटत नाही. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


राणा यांनी केलेल्या आरोपाबाबत बच्चू कडू गप्प का ? भविष्यात ते ठाम भूमिका घेतील 


आमदार बचू कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी आरोप केले आहेत. या आरोपाबाबत देखील जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न  विचारला. यावेली पाटील म्हणाले की, त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नवल वाटण्यासारखं काय आहे. खोक्याबाबत आरोप होऊनसुद्धा बच्चू कडू अजून गप्प का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. भविष्यात बच्चू कडू हे ठामपणाने भूमिका घेतील असे मला वाटते. खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला ते काही चुकीचा वाटत नाही असा चिमटाही जयंत पाटील यांनी कडू यांचे नाव न घेता शिंदे गटाला लगावला.


महत्त्वाच्या बातम्या:


महाविकास आघाडीच्या 15 नेत्यांची सुरक्षा काढली; मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ तर आव्हाडांची सुरक्षा जैसे थे, शिंदे सरकारचा निर्णय