नाशिक : केंद्र सरकारच्या मदतीनें नाशिक महानगरपालिका नमामी गंगाच्या धर्तीवर नमामी गोदा हा प्रकल्प राबविणार आहे. 1842 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा आरखाडा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पाठविण्याची तयारी सत्ताधारी भाजपने सुरू केलीय.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. 


 गोदावरी नदीमुळेच नाशिकच नाव जगाच्या नकाशावर कोरले गेलं आहे. दरवर्षी जगभरातून लाखो भाविक नाशिकला येत असतात. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळा होतो, हिंदू धर्म शास्त्रातील सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव.. गोदीवरी नदी पात्रातच लाखो साधू महंत शाहीस्नान करतात. मंदिराची नगरी ओळख असणाऱ्या नाशिकच सौंदर्य याच गोदावरी नदीन खुलावल आहे. गोदमाई ही नाशिककरांसह भाविकांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळाचा विषय आहे. त्यामुळेच गोदावरी नदीच्या नावाने कायमच राजकारण होत असत. मात्र गोदमाई ची प्रदूषणाच्या गर्तेतून सुटका होत नाही.   मात्र आता प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या गोदमाईची प्रदूषणातून सुटका होण्याचा मार्ग आता दिसू लागलाय. 


दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा विकासाकडे केंद्र सरकारने लक्ष घातलं असून नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा हा प्रकल्प राबविला जाणार आहे. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यां नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गोदावरी प्रदूषणमुक्ती आणि काठच्या सुशोभीकरणचा  1842 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. याबाबत शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर आरखाडा सादर करण्याच्या सूचना दिल्यात, त्यानुसार महापालिकाच्या महासभेन ठराव ही मंजूर केलाय. नाशिक शहरातून जाणाऱ्या 19 किलोमीटर लांबीच्या गोदावरी नदीच्या  काठांचा विकास आणि सुशोभीकरण  होणार आहे.
 
गोदावरीसह ,नासर्डी, वालदेवी, वाघाडी या उपनद्यांची प्रदूषण्याच्या विळख्यातून मुक्तता करणे,  अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीसह शहरांच्या विविध भागातील गटाराचे गोदा पत्रात मिसळणारे रसायन मिश्रित पाणी रोखणे, मलनिस्सारण केंद्राची उभारणी करणे, गोदावरी नदी पत्रातील गाळ काढून पाणी साठवण, वहन क्षमता वाढविणे अशी असंख्य काम नमामी गोदा या प्रकल्पा अंतर्गत पूर्ण होणार आहे. आगामी कुंभमेळाच्या आधी सम्पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार आहे. आहे येत्या दोन तीन महिन्यात नमामी गोदा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचा आशावाद नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय.


गोदावरी नदीची प्रदूषणाच्या गर्तेतून मुक्तता करण्यासाठी 2012 पासून न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र अद्याप गोदमाई मोकळा श्वास घेऊ शकली नाही, स्मार्ट सिटी अंतर्गत  प्रोजेक्ट गोदा राबविला जातोय यासाठी जवळपास 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  गोदावरीच्या नदीपात्रातील काँक्रेटीकरणाचे अडथळे दूर करणे, गोदावरीच्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठीअहिल्याबाई होळकर पुला जवळ मेकॅनिकल गेट बसविणे अशा अनेक काम हाती घेण्यात आली आहेत. या कामाचे काय?. मागील कुंभमेळा काळात गोदा पात्राला लागून घाट बांधण्यात आले होते, त्याचा अद्याप उपयोग होत नसल्याने नव्याचा घाट का घातला जातोय असा सवाल गोदावरीची प्रदूषणातून मुक्तता करण्यासाठी आणि गोदा पात्रातील 17 कुंड पुनरुज्जीवित करण्यासाठी लढा देणाऱ्या गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केलाय


नाशिक महानगरपालिका निवडणूक 7 ते 8 महिन्यांवर येवुन ठेपली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना टक्कर देण्यासाठी सत्ताधारी भाजपने मोठं मोठे प्रकल्प हाती घेण्यास सुरुवात केलीय, द्वारका ते नाशिकरोड नवा उड्डाणपूल, मनपाची बससेवा, टायरबेस मेट्रो प्रकल्पासह नमामी गोदा हा भाजपचा मास्टर स्ट्रोक आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर भाजप निवडणुकीला समोर जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप मोठा गाजावाजा करत नमामी गोदा प्रकल्प राबविण्याची तयारी करत आहे,मात्र तेवढयाच प्रामाणिकपणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  करण्याची जबाबदारी भाजपची आहे. अन्यथा नाशिककराच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ येईल त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होतो याकडे नाशिककरांच लक्ष लागलाय.