Nandurbar Agriculture News : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. काबी ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारली होती. त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं संकटात सापडली होती. मात्र, अखेर 15 दिवसांच्या उघडीपीनंतर पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या अंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे.


वेळेवर पाऊस झाल्यानं बळीराजा समाधानी


नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारली होती. त्यामुळं सध्या पिकांना पाण्याची गरज होती. तेव्हा जिल्ह्यात सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. याचा सर्वाधिक फायदा कापसाच्या पिकाला झाला आहे. कापूस पीक फुल फुगडी लागण्याच्या अवस्थेत आहे. अशा स्थितीत पाऊस पडल्यामुळं बोंड लागण्याची क्षमता वाढणार आहे. तसेच इतरही पिकांना हा पाऊस जीवनदायी ठरला आहे. पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल कायम राहण्यासाठी अंतर मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. सध्या वेळेवर पाऊस आल्यानं आणि पिकांना जीवदान मिळाल्यानं बळीराजा समाधानी असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.


राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज कोकणातील रायगड तसेच ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पिकांसाठी पावसाबरोबर पुरेशा सूर्यप्रकाशाचीही गरज असते. परंतू, गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. अशा वातावरणामुळं शेंगअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.


महत्त्वाच्या बातम्या: