Nana Patole मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी रणशिंग फुंकलंय. महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केलीय.  महाविकस आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये आणि राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा आणि नावं पुढे येत होती. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करून आज मोठी घोषणाच केली आहे.


पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकप्रकारे निर्धार केलाय. सोबतच या चर्चांना अंशत: पूर्णविराम मिळाला आहे. तर त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole on Maharashtra CM) सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.   


महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?


उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर महत्वाचे भाष्य केलंय. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे  यांनी मुद्दामून हा प्रश्न टाकलाय. त्यांच्या माध्यमातून आता हा विषय चर्चेत राहील, पण मुख्यमंत्री चेहरा कोण असेल हे जेष्ठ नेते मिळून ठरवतील आणि अंतिम निर्णय घेतील. असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे एका वाक्यात सांगितलंय. 


अजूनही त्यांचा घमंड उतरला नाही


भ्रष्ट सरकारच्या विरोधात आज आपण प्रचाराचा नारळ फोडून महाविकास आघाडी म्हणून प्रचाराला सुरुवात करत आहोत. हे सरकार घाबरलेलं सरकार आहे. रोज नवीन जीआर काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. काल, 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी लाल किल्यावर पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं ते मी ऐकत होता. यावेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जे स्थान तिथे द्यायला हवं होतं ते दिल्या गेलं  नाही. हा एक प्रकारे द्वेष होता आणि हा लोकशाही वरचा हल्ला आहे. लोकशाहीचा तो खून होता. अजूनही त्यांचा घमंड उतरला नाही. अशा शब्दात  नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. 


दिल्लीत बसलेल्या दोन नेत्यांचे एटीएम महाराष्ट्र- नाना पटोले 


दिल्लीत बसलेल्या दोन नेत्यांचे एटीएम महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रला कंगाल करण्याचा काम हे करताय. आता यांचा हे  एटीएम आपल्याला बंद करायचा आहे. तर सुप्रीम कोर्टाने सरकारला झोडपलंय, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला शेतकऱ्यांना  द्यायला पैसा नाही आणि तुम्ही योजना आणताय. नोकरभरती करणार नाही, असा सरकार ने ठरवलंय. मला शंका आहे की या लाडक्या बहिणीकडून हे पैसे वसूल करू शकतात. तुम्ही या योजनेत बसत नाही म्हणून पैसे परत द्या, असा सुद्धा हे सांगून पैसे परत घेऊ शकतात. आमच्या सरकाराच्या पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली होती. मात्र हे सरकार आज शेतकऱ्यांची लूट करत असल्याची टीकाही नाना पटोलेंनी सरकारवर केली आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या