Nagpur News नागपूर : दीक्षाभूमी (Deekshabhoomi) यापुढे भारतीय बौद्ध महासभेची राहील, असा दावा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी केला आहे. 1  जुलै रोजी नागपूरातील दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज भीमराव आंबेडकर यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. त्यावेळी ते उपस्थित जनसमुदायासमोर बोलत होते. दीक्षाभूमीच्या व्यवस्थापन सांभाळणारी विद्यमान स्मारक समिती गद्दार असून त्यांना एक मिनिटही समितीवर राहण्याचा अधिकार नाही. आंबेडकरी जनतेच्या न्यायालयाने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे व्यवस्थापन सांभाळणारी स्मारक समिती दीक्षाभूमीची मालक नसून आंबेडकरी जनता दीक्षाभूमीचे खरी मालक असल्याचे भीमराव आंबेडकर म्हणाले.


दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळावी- भीमराव आंबेडकर 


दीक्षाभूमीसाठी तत्कालीन आंबेडकरी नेते आणि रिपब्लिकन नेत्यांनी संघर्ष केल्यावरच 14 एकर जमीन मिळाली होती. तेव्हाच्या कागदपत्रांच्या नुसार ती 14 एकर जमीन भारतीय बौद्ध महासभेला मिळाली होती. 1960 मध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारतीय बौद्ध महासभेच्या दरम्यान झालेल्या कागदोपत्री व्यवहार आमच्याकडे उपलब्ध असून तो आम्ही प्रशासनाला सादर करणार आहोत.  प्रशासनाने त्या संदर्भात सुनावणी घ्यावी आणि दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला द्यावी, अशी मागणी ही भीमराव आंबेडकर यांनी केली.


....म्हणून तेव्हा भारतीय बौद्ध महासभेला जमीन मिळू शकली नाही


काही जुन्या राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळेच सरकारने देऊ केलेली जमीन तेव्हा भारतीय बौद्ध महासभेला मिळू शकली नव्हती. आज त्याच राजकीय नेत्यांचे मुलं दीक्षाभूमीचा कारभार सांभाळत असल्याची टीकाही भीमराव आंबेडकर यांनी गवई कुटुंबांचे नाव न घेता केली आहे. दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळावी, अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी कार्यकर्ते अन् आंबेडकरी जनतेने संघर्षासाठी तयार राहावं, असा इशारावजा आव्हानही भीमराव आंबेडकर यांनी केला आहे.


समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका


वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना केवळ समाजमाध्यमावरच्या खोट्या अफवा आणि त्या अफवांची कसलीही चौकशी न करता त्यावर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवला. परिणामी त्यातूनच आंदोलनाचा भडका उठल्याचे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनाआधी अंडरग्राऊण्ड पार्किंगचा नागपूर मेट्रोशी कोणताही संबंध नसताना फक्त अंडर ग्राऊण्ड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणलेल्या बॅरिकेट्स वर नागपूर मेट्रो लिहिले होते. त्यामुळं ही पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल, ही अफवा पसरवण्यात काही समाजकंठक यशस्वी झाल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप आगलावे (Pradeep Aglave) यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या