नागपूर : एकीकडे शहरी विद्यार्थी सोशल मीडियावरील घातक गेम्समुळे जीव धोक्यात घालत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात खर्रा खाण्याच्या सवयीमुळे मध्य भारतातील शाळकरी मुलंही कॅन्सर सारख्या आजारांच्या दारात उभी ठाकत आहेत.


नागपूरच्या शीतलचं तोंड एका बोटाच्या आकाराइतकंही उघडत नाही. त्याला कारणीभूत ठरला आहे जीवघेणा
खर्रा... पण अवघ्या 13 वर्षांच्या मुलीला खर्ऱ्याचं व्यसन जडलं कसं?

शीतल ज्या गावात रहायची, तिथली माणसं शीतलला येता जाता खर्रा आणायला सांगायची. खर्रा आणला, की त्यातली एक चिमूट शीतलला द्यायची. तिथूनच शीतलला या खर्याचं व्यसन जडलं.

शीतल अॅडमिट झाली, काही चाचण्या झाल्या, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. शीतल कॅन्सरच्या दारात होती. 2012 पर्यंत अशी एकही केस ऐकिवात नव्हती. पण गेल्या 6 महिन्यात अशा 50 केसेस आढळून आल्या आहेत. शीतलच्याच गावात पाचव्या वर्षापासून खर्रा खाणारी अनेक मुलं आहेत.

शीतलचे वडील शेतमजूर... त्यांनाही खर्ऱ्याचं व्यसन आहे. रोजच्या 300 रुपयांच्या मिळकतीपैकी 20 रुपये खर्ऱ्यावर घालवतात. पण पोरीची अशी अवस्था पाहून बापानं आता खर्रा सोडून दिला. मात्र हा खर्रा किती जणांच्या जीवावर उठणार, हा सवाल कायम आहे.