नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2017 06:20 PM (IST)
उस्मानाबाद : नाफेडची तूरखरेदी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तूर खरेदी केंद्राबाहेर 5 ते 7 किलोमीटरच्या ट्रॉल्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. लातूर, अकोला, सोलापूर, हिंगोलीसह जवळपास प्रत्येक तूर उत्पादक जिल्ह्यात असंच चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी सगळी कामं सोडून खरेदी केंद्राबाहेर तुरीची राखण करत आहे. हिंगोली जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. तुरीचे उत्पादन चांगले झाल्याने शेतकरी सुखावला होता. तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. व्यापारी 4000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत होते, तर शासन 5000 रुपये प्रति क्विंटलने खरेदी नाफेडच्या माध्यमाने करत होते.