Mumbai-Pune Expressway : शिसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज (14 ऑगस्ट) सकाळी अपघातात निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. त्यांच्या या निधानने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण या महामार्गावर सातत्यानं अपघात होत आहेत. अनेकवेळा या अपघातात मोठी जीवितहानी देखील झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात अनेक दिग्गजांचा मृत्यू देखील झाला आहे. या महामार्गावर झालेल्या अपघातात मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे (Bhakti Barve), लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar) आणि अक्षय पेंडसे यांचा समावेश आहे.


12 फेब्रुवारी 2001 रोजी भक्ती बर्वे यांचे झालं होतं निधन


बालकलाकार ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या भक्ती बर्वे यांचे 12 फेब्रुवारी 2001 अपघातात निधन झालं होतं. त्यांच्या गाडीला वाई येथून मुंबईला परतताना अपघात झाला होता. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झाला होता. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली होती. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली होती. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळं त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली होती. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. 'ती फुलराणी' हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. 'ती फुलराणी' चे  एक हजाराहून अधिक प्रयोग झाले. 'आई रिटायर होतेय' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.


आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचेही अपघातात झाले होते निधन


लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघातात निधन झाले होते. मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता.  मुंबई-पुणे दृदगती मार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक त्यांचा अपघात झाला होता. ही घटना 23 डिसेंबर 2012 मध्ये घडली होती. त्यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती. यामध्ये आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्याबरोबरच अक्षयच्या दोन वर्षाच्या मुलाचा प्रत्युषचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण कलाविश्व हादरलं होतं. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. 'शुभंकरोती', 'या गोजीरवाण्या घरात' या त्यांच्या गाजलेल्या भूमिका असलेल्या मालिका होत्या. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होते. तर अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही प्रायोगिक नाटके, 'मिस्टर नामदेव म्हणे' हे व्यवसायिक नाटक आणि 'उत्तरायण' चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या. या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील आणखी दोन महत्वाचे कलाकार काळच्या पडद्याआड गेले होते.


अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला देखील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात संग्राम जगताप जखमी झाले होते. तसेच अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या गाडीला देखील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात मलायका अरोरा जखमी झाली होती.


पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाताची कारणे


सातत्यानं पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होत आहेत. आज या महामार्गावर झालेल्या अपघात शिवसंग्रमाचे प्रमुख विनायक मेटे यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होण्याची विविध कारमं आहेत.
या महामार्गावर अनियंत्रित उतार आहे. टोकदार वळणे देखील आहे. तसेच यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघातांची संख्या व नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे. जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग तसेच वाटेत बंद पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे अशी अपघाताची विविध कारणे आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: