मुंबई : राजधानी दिल्लीतील मराठी माणसांचं हक्काच ठिकाण म्हणजे महाराष्ट्र सदन होय. दिल्ली (Delhi) दरबारी किंवा दिल्लीतील संसद भवनाकडे गेलेल्या मराठी माणसांची ओढ महाराष्ट्र सदनकडे असते. महाराष्ट्र सदनमध्ये आपला मुक्कमो ठेऊन ते आपली कामे मार्गी लावतात. मात्र, महाराष्ट्र सदनमधील इतर सुविधांबाबत कायमच तक्रारी आल्या आहेत. मुंबईत आमदार निवासात कार्यकर्ते येतात, राहतात. त्याचप्रमाणे राजधानी दिल्ली महाराष्ट्र सदनमध्ये (Maharashtra sadan) कार्यकर्त्यांचा मुक्काम असतो. मात्र, येथील काही सुविधांवरुन आता चक्क खासदारानेच संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्र सदनातील कँटीन आणि सुविधेबाबत शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये, सदनातील सुविधांच्या बोजवारा उडाल्याचा पाढाच त्यांनी वाचलाय.  


खासदार रवींद्र वायकर ह्यांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव करुन दिल्ली गाठली. त्यांच्या मतदारसंघातील निकालावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेष म्हणजे हे निकालाचं प्रकरण अद्याप न्यायालयातही आहे. त्यामुळे, रवींद्र चव्हाण राजकीय वर्तुळात चर्तेत आहे. त्यातच, आता रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र सदनमधील सोयी-सुविधांवरुन संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे.   


उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवू इच्छितो की, महाराष्ट्र शासनाने दिल्ली या ठिकाणी उत्कृष्ट असे "महाराष्ट्र सदन" उभारले आहे, यात जवळपास 132 खोल्या आहेत. अधिवेशनाच्या काळात, तसेच अन्य कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनता या ठिकाणी वास्तव्यास येतात. "महाराष्ट्र सदनाची" वास्तू जरी चांगली असली तरी या सदनामध्ये काही सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे म्हणत रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र सदनमधील काही उणिवा दाखवून दिल्या आहेत.  


काय आहेत उणिवा, तक्रारी


1. या ठिकाणी फक्त खासदारांसाठी वेगळा सेल असणे आवश्यक आहे. जेणेकरुन या ठिकणी मा. खासदार तसेच त्यांचे स्वीय सहायक शासकीय पत्र व्यवहारांची कामे करणेसाठी येऊ शकतात, सदनामध्ये असणा-या खासदारांची संख्या व खासदार कक्षात असणारी संगणकांची संख्या ही अपुरी असून, त्यात वाढ करणे, तसेच आधुनिक पध्दतीचे संगणक व प्रिंटरची व्यवस्था करणे आवश्यकता आहे. त्याचबरोबर खासदारांच्या पत्र व्यवहाराची कामे वेगाने करुन देण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेवरील टंकलेखनावर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे.


2. या सदनामध्ये वाय-फायची सुविधा तर देण्यात आली आहे, परंतू त्याचा दर्जा चांगला नसल्याने खोलीच्या आतमध्ये मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे आलेले फोन घेताना व करताना, त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉपवर काम करताना, वाय-फायचे कनेक्शन व्यवस्थित मिळत नसल्याने काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.


3. महाराष्ट्र सदनामध्ये उपहार गृहाची जी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये मिळणाऱ्या खादय पदार्थांचे दर ही जास्त असून, पदार्थांचा दर्जाही चांगला नाही. नागपूर येथील आमदार निवासातील उपहारगृह मधील पदार्थाचे दर व "महाराष्ट्र सदन" उपहारगृहातील खादयपदार्थाचे दर यात मोठ्या प्रमाणात तफावत आहेत. या सर्वांचा विचार करुन सुधारणा होणे अपेक्षित आहे.


4. पावसाळयात काही वेळा अधिका-यांच्या आदेशावरुन सदनातील खोल्यांमध्ये नळाद्वारे मिळणा- या गरम पाण्याची व्यवस्था बंद ठेवण्यात येते. अशावेळी महाराष्ट्र सदनांच्या खोल्यांमध्ये राहणा- यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. त्यामुळे अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर जर गरम पाण्याची व्यवस्था बंद करण्यात येत असेल तर सदनातील खोल्यांमध्ये राहणा-यांना गरम पाणी मिळावे यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.


5. सदनाच्या खोल्यांमधील पलंगावरील गादया, फर्नीचर हया जुन्या झाल्या असून, त्या बदलणे त्याचप्रमाणे नळाला येणारे पाणी पूर्णतः शुध्द मिळणे आवश्यक आहे.


तरी या पत्राच्या माध्यमातून नवीन महाराष्ट्र सदनामध्ये मी सुचविलेल्या सुविधांचा व सुधारणेचा विचार करण्यात यावा, ही विनंती, असे रवींद्र वायकर यांनी आपल्या पत्रातून म्हटलं आहे. त्यामुळे, खासदार वायकर यांच्या पत्रानंतर आता महाराष्ट्र सदनमधील या अडचणी व सुविधांवर काम होईल का हे पाहावे लागेल.