नांदेड : राज्यातल्या आश्रमशाळा या मृत्यूशाळा झाल्याचं चित्रं समोर आलं आहे. कारण केवळ साप चावल्यानं गेल्या 17 वर्षात जवळपास 700 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याला आश्रमशाळांची दुरावस्था कारणीभूत ठरली आहे.


नांदेड जिल्ह्यातील कुपटीची सरकारी आश्रमशाळा. इथं शिकणाऱ्या दोन मुलींना 15 दिवसापूर्वी विषारी साप चावला. विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानं शिक्षक धावले, पण कुपटी मुख्य रस्त्यापासून 25 किलोमीटर दूर आहे. दुर्गम भाग असल्यानं वाहनांची सोय नाही. कोसळत्या पावसात शिक्षकांनी दोन्ही मुलींना मुख्य रस्त्यापर्यंत नेलं आणि 7 तासानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. 11 दिवसांनी एका मुलीचं निधन झालं तर सुदैवानं दुसरीचे प्राण वाचले.

या शाळेभोवती जंगल आहे. त्यामुळे सर्पदंश झाल्याची पहिली घटना शेवटची असणार नाही. पण सरकारी आश्रमशाळांची अवस्था फारच वाईट आहे. सव्वादोनशे मुलांच्या रहिवासाची इमारत. जेवणाच्या हॉलमध्ये मुलींनी राहायचं. जेवण उरकलं की तिथल्याच फरशीवर झोपायचं. हॉलमध्ये मुलींना शौचालयाची सोय नाही. त्यामुळे अपरात्री जीव मुठीत घेऊन बाहेर जावं लागतं.

आश्रमशाळेतील मृत्यूनंतर एबीपी माझानं राज्यभरातल्या आश्रमशाळांमध्ये किती मृत्यू झालेत याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सरकारनं आजवर जाहीर न केलेला अहवाल एबीपी माझाच्या हाती आला.

साप चावून, मलेरियाचे डास चावून, पाण्यात बुडून, गंभीर आजारानं 2001 पासून मार्च 2017 पर्यंत 1 हजार 595 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर फक्त सर्पदंशानं 700 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.

आश्रमशाळा म्हणजे विद्यार्थांचं 11 महिन्यांचं घर. 560 अनुदानित खाजगी आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी सरकारी अनुदान घेऊनही वसतिगृह बांधलेलं नाही. शौचालय, आंघोळीची जागा नाही. 529 आश्रमशाळेत मुलांना राहायला नीट जागा नाही.

आमदारांच्या मनोरा निवासातील सिलिंग कोसळल्यावर धावपळ करणाऱ्यांच्या गावी आश्रमशाळेचं वास्तव आहे का? हा प्रश्न आहे.

योगेश लाटकरसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, नांदेड