सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सापांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे.


सांगली शहर दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथे जैव विविधता विपुल आहे. मगरींपासून ते 150 जातींच्या विविध पक्षांनी येथील परिसर संपन्न आहे. पण या प्रलयकारी पुराने मगरींनाही आपला अधिवास सोडावा लागला. पुरात नागरी वस्तीत घुसलेल्या दोन मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले होते तर दुसरीकडे पुरासोबत आलेले अनेक साप पाण्यात बुडालेल्या घरांमध्ये दडून बसले आहेत. या सापांना सर्प मित्रांची मदत घेवून बाहेर काढावे लागत आहे.

महापुरानंतर रोज साधारणत: 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडले गेले. याशिवाय काही कासवेही नागरी वस्तीत आली होती. त्यांनाही पुन्हा नागरी वस्तींपासून दूर सोडण्यात आले. दोन मगरीही मानवी वस्तीत आल्या होत्या त्यांनाही त्यांच्या पर्यावरणात सोडण्यात आले. यासाठी सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी मदत केली. प्राणीमित्रांनी अनेक प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर नेऊन त्यांच्या अधिवासात सोडल्याचे सांगितले.

वन संरक्षण कायद्यानुसार साप पकडण्याबाबत निर्बंध आहेत. पण, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जाते. नेचर कन्झर्वेटिव्ह सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी महापुरातून शहरात आलेल्या अडीचशेहून अधिक सापांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे.

या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण, टस्कर अशा सापांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी मगरी ही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत.

दरम्यान, कृष्णा नदीबरोबरच वारणा नदीकाठाला देखील महापुराचा मोठा फटका बसला आहे.  यामुळे या भागात देखील घराची मोठी पडझड झाली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  त्यामुळे या वारणा नदी काठी वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या लोकांना मदत पोहोचविण्याचे काम औरंगाबादमधील अभ्युदय फाऊंडेशन, महात्मा गांधी मिशन परिवार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि तमाम औरंगाबादकरानी दिलेल्या मदतीतून केले जातेय. कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील  वाळवा तालुक्यातील  शेवटचं टोक असलेल्या गावच्या वाड्या-वस्त्यावर या औरंगाबादमधून आलेल्या मदतीचे वाटप केले गेले. सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या वाळवा तालुक्यातील काही भागात, वाड्या वस्त्यावर देखील मदत पोहचू लागली आहे.