Winter Assembly session :  17 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या विधीमंडळाच्या  पावसाळी अधिवेशनाचा (MONSOON ASSEMBLY SESSION) आज समारोप झाला आहे.  आता पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. 


हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन सलग दोन वर्षे मुंबईत घेण्यात आले.  राज्य विधिमंडळाचे वर्षातून तीन अधिवेशन घेतले जातात. या तीन अधिवेशनापैकी दोन अधिवेशनाचे कामकाज मुंबईतील विधानसभा सभागृहातून चालते. त्यासाठी, राज्यातील सर्वच आमदार मुंबईला येतात. तर, हिवाळी अधिवेशन दरवर्षी उपराजधानी नागपूरला घेतले जाते.


 विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा समारोप झाला. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल अभूतपूर्व असा गोंधळ घडला. 


महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होती. आज अधिवेशनाची सांगता होणार झाली. आता येत्या अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था, मंत्रिमंडळ विस्तार यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


विधिमंडळाचं यंदाचं अधिवेशन सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे गाजले आहे. आमदारांनी एकमेकांना केलेली धक्काबुक्की यामुळेच अधिवेशनाची अधिक चर्चा झाली . पुढील अधिवेशनात सुधारणा  होईल अशी अपेक्षा होती.  एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळाच्या पायऱ्यावर मांडले असते तर त्यांची निवडही सार्थकी लागली असती आणि लोकांचेही प्रश्न सुटले असते. पण गटातटाच्या या राजकारणात लोकांच्या प्रश्नाचं गांभीर्य कोण ठेवेल? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.