Raosaheb Danve : पुढे ज्या काही घडामोडी घडणार आहेत ते आपल्याला काही काळातच दिसून येईल असं सुचक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं आहे. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्भूमीवर दानवे यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण स्पष्ट झाले आहे. लोक आता या सरकारला कंटाळले आहेत. पुढच्या काही घडामोडी घडणार आहेत ते आपल्याला काही काळातच दिसून येतील असे दानवे म्हणाले. 


जनतेच्या प्रश्नाकडं राज्य सरकारचं दुर्लक्ष


विधान परिषद निवडणुकीत महविकास आघाडीची मते फुटली आहेत. आघाडी सरकारमध्ये बेबनाव असल्यानं जनतेच्या प्रश्नाकडं संपूर्ण दुर्लक्ष असल्याचेही दानवे यावेळी म्हणाले. विधानपरिषदेच्या या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण स्पष्ट झाले असून लोक आता या सरकारला कंटाळले असल्याचे दानवे म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मते फुटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता पुन्हा विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मत फुटल्याचे स्पष्ट झाल्याचे दानवे म्हणाले. या सरकारचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. जनतेकडं दुर्लक्ष झाल्याचे दानवे म्हणाले.
   
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.


नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.