कल्याण : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील या शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.


यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी चांगला रस्ता शोधून दाखवा अशी स्पर्धा भरविण्यास सांगत कानपिचक्या देखील दिल्या. कल्याण डोंबिवली शहरात काँक्रिट रस्त्याची कामे सुरू असली तरी अनेक रस्ते उखडले असून या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे उडणारी धूळ यामुळे नागरिक वाहनचालक बेजार झाले आहेत.


प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्ड्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाच्या वर्मावर बोट ठेवत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर देखील उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या मंत्र्याने टीका केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला टोला लागवल्याची चर्चा शहरात रंगली आहे.