परभणी : राज्यातील नऊ जिल्ह्यांसाठीच्या सैन्य भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चार ते 14 जानेवारी दरम्यान ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी एकूण 65 हजार उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. शुक्रवारी रात्री 12 वाजता या सैन्यभरती प्रक्रिया सुरुवात झालीय. मात्र, हजारोंच्या संख्येने इथे येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी परिक्षार्थींना भर थंडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने पहिल्याच दिवशी हजारो उमेदवारांची निराशा झाल्याचे पाहायला मिळालं.


परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 10 दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत रोज तीन जिल्ह्याच्या जवळपास पाच ते सहा हजार उमेदवारांना इथे बोलावण्यात येत आहे. पहिल्या दिवशी परभणी, बुलढाणा, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील उमेदवारांना इथे बोलावण्यात आलं. हजारोंच्या संख्येने हे तरुण परीक्षार्थी इथे रात्री नऊ वाजल्यापासूनच दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया ही रात्री 12 वाजता सुरू झाली. महत्वाचं म्हणजे इथे अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने कुणाला रस्त्याच्या बाजूला, कुणाला फुटपाथवर तर कुणाला मैदानात थंडीत कुडकुडत उघड्यावरच थांबावं लागल. ना पाण्याची व्यवस्था ना लाईट अनेकजण मोबाईलच्या टॉर्च मध्ये आपले कागतपत्र जमा करत होते. तर काही विद्यार्थ्यांना उघड्यावर झोपल्याने पोलिसांच्या लाठीचा प्रसाद ही खावा लागलाय. रात्री 12 ते सकाळी सहा या वेळेत ही भरती होणार असल्याने भर थंडीत या तरुणांचे मोठे हाल होत आहेत.

प्रशासनाकडून काहीच व्यवस्था का नाही?
दोन दिवसांपूर्वीचे परभणीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. थंडीच्या महिन्यातच पाऊस बरसल्याने हवेतला गारवा वाढला आहे. परिणामी परभणीत सध्या भयानक थंडी पडली आहे. अशातच ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हजारो तरुण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून परभणीत दाखल झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांची काहीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलांना थंडीत कुडकुडतच बाहेर रात्र काढावी लागत आहे.

संबंधित बातमी -

काँग्रेसमुळे अडलेलं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता, काँग्रेसची खातेवाटपाची अंतिम यादी 'एबीपी माझा'च्या हाती

CAA, NRC विरोधी छात्र परिषद : आदित्य ठाकरे आणि उमर खालिद एकाच मंचावर

स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : उन्हामुळे चक्क मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सैन्य भरती