मुंबई : युवासेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि विद्यार्थी नेता उमर खालिद एकत्र मंचावर दिसणार आहेत. मुंबईत उद्या (5 जानेवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनआरपी) विरोधात छात्र परिषद होणार आहे. या परिषदेसाठी दोन्ही युवा नेते एकत्र येणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उद्या दुपारी एक ते पाच दरम्यान ही छात्र परिषद होणार आहे.


या परिषदेचं आयोजन छात्र भारती या विद्यार्थी संघटनेने केलं आहे. या परिषदेसाठी विद्यार्थी नेता उमर खालिद, लेखक आणि कवी जावेद अख्तर, आमदार रोहित पवार, आमदार वर्षा गायकवाड, AMUSU अध्यक्ष सलमान इम्तियाज, जामिया विद्यार्थी नेते हम्मादूररहमान, सादिया शेख यांच्यासह देशभरातील विद्यार्थी नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते सागर भालेराव यांच्या माहितीनुसार, पाच जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

या छात्र परिषदेत JAC Mumbai, AISF, SFI, ASA, TISS Student Unions, Samyak, MASU, SIO, CYSS, PSU, AIPC, DYF, AYW, Vidhyarthi Bharati, Mumbai Graduate Forum या विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत.

राज्यात एकही अमानवी डिटेंशन कॅम्प उभारु देणार नाही, असं आश्वासन शिवसेनेने आधीच दिलं होतं. आदित्य ठाकरे सीएए आणि एनआरसीबाबत पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करतील, असं सागर भालेराव यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्र विकास आघाडी बनवली आणि सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री आहेत.