मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला आनंदाची बातमी दिली आहे. लातूरमध्ये रेल्वे आणि मेट्रोसाठी डबे तयार होणार आहेत. त्यामुळे तब्बल 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.


रेल्वे आणि राज्य सरकारचा एमआयडीसी विभागात 600 कोटींचा करार झाला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित होते.

लातूरमधल्या कोच बांधणी प्रकल्पात 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. लातूर, बीड, परभणी या क्षेत्रात रेल्वे आणि मेट्रो कोच बांधणीसाठी वेंडर्सची इको सिस्टम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा हा 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चा खरा लाभार्थी ठरणार आहे.

जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांनी या प्रकल्पाबाबत घोषणा केली होती. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील–निलंगेकर यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता.

उपनगरी रेल्वे-मेट्रोच्या डब्यांचा निर्मिती प्रकल्प लातूरमध्ये


रिलायन्स, व्हर्जिन हायपरलूप, गृहनिर्माण आणि जेम्स-ज्वेलरी इंडस्ट्री यांच्यासोबतही सर्वात मोठे करार झाले. व्हर्जिन हायपरलूप टेक्नॉलॉजीची चाचणी केली आहे. फिजीबीलिटी रिपोर्टनुसार मुंबई-पुणे मार्ग सुचवण्यात आल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गासाठी 71 टक्के भूसंपादन झालेलं आहे. समृद्धीसाठी एकही इंच जमीन परवानगीशिवाय घेतलेली नसल्याचा दावा, यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

रत्नागिरी रिफायनरीचा एमओयू मॅग्नेटिक महाराष्ट्रात झाला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं. चेंबूरमध्ये 40 वर्षांपासून रिफायनरी असून कुठलीच हानी झाली नाही. मी स्वतः उद्धव ठाकरे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. साधारणतः आम्ही कधीच कोणावर प्रकल्प लादला नाही. आम्ही त्याचे फायदे लोकांना पटवून देण्याचे काम करत आहोत. आज नाणार रिफायनरीचा MOU झालेला नाही मात्र तो भविष्यात करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 43 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या


पंतप्रधान मोदींच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 चं उद्घाटन


काय आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018?


रिलायन्सची सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रातच : मुकेश अंबानी


‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या आयोजनाची जबाबदारी पुन्हा…