मुंबई : जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला चांगला बरसल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर मात्र काहीसा पावसाचा खंड पडला. मागील 2-3 दिवस महाराष्ट्र पुन्हा चांगला बरसला. मात्र, 29 जुलैनंतर संपूर्ण देशातच पावसाचा खंड बघायला मिळणार आहे. अशातच जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता नाही आहे.
 
भारतीय हवामान विभागाकडून एक नवा प्रयोग केला जात आहे. ज्यात दर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे. अशात जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर मराठवाड्यात सरासरी पावसाचा अंदाज होता. अशातच संपूर्ण देशाचा विचार केला तर जुलै महिन्यात पाऊस सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून जुलै महिन्यात सरासरी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात कमी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशात चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. तर जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो.
 
साधारण 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापत असतो, मात्र मान्सून कमकुवत झाल्याने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून संपूर्ण देश व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत साधारण 8 जुलैपर्यंत मान्सूनचा पाऊस नसेल, त्यामुळे 1-2 दिवस तापमानात सरासरीपेक्षा 5-6 अंश सेल्सिअस अधिक राहण्याचा अंदाज आहे. यात पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेशातील काही भाग, उत्तर राजस्थान आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशात तापमान सामान्यपेक्षा अधिक असेल. मात्र, अरबी समुद्रातील पश्चिमी वाऱ्यांनी हा भाग व्यापला की तापमान खालवण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, मान्सून दिल्ली, हरियाणा, राजस्थानातील काही भाग आणि पंजाबमधील काही भागात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतात पाऊस कमी असणार आहे. शेतकऱ्यांकडून पेरण्यांची कामं साधारणत: जुलै महिन्यात उत्तर भारतात सुरु होतात. त्यामुळे पाऊस कमी असलेल्या भागात सिंचनाची परिस्थिती पाहून पेरण्या कराव्यात अन्यथा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतीची कामं करावे असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.