मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. सोबतच अनेक कलाकार, साहित्यिक तसेच खेळाडूंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक बाजार समित्यांनी उद्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.


सोलापूर : दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. बाजार समितीतील अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकत्रित घेण्यात आला आहे.


नाशिक: नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापतींनी शेतकऱ्यांना सोमवारी शेतीमालाची तोड करू नये, मंगळवारी बाजार समितीत शेतीमाल आणू नये, देशव्यापी बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या विधेयका विरोधात बाजार समिती बंद असणार आहे. नाशिक बाजार समिती सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांनी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय केला केला आहे.


लासलगाव : दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या हिताकरिता व्यापारी वर्गाचे वतीने पाठिंबा देण्यासाठी उद्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा लिलाव कडकडीत बंद राहणार आहे. याची सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असं लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशननं कळवलं आहे.


नवी मुंबई : उद्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. उद्या देशभरात होत असलेल्या संपाला आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. उद्या आमचे सर्व माथाडी बांधव देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. केंद्र सरकारने कृषी आणि पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि माथाडीची कामे कमी झाली आहेत याचाच निषेध नोंदवण्यासाठी आम्ही संपाला पाठिंबा दिला आहे, असं माथाडी बांधवांनी सांगितलं आहे.


माथाडी कामगारांचा पाठिंबा
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 8 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार असून त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. तसेच व्यापारी व माथाडी कामगारांवर बेकारीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषित केले आहे. नवी मुंबई एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर , कोल्हापूर मधील बाजार समित्याही उद्याच्या बंद मध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती आहे.


पुणे : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चाकण बाजार समिती बंद राहणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समितीने निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा येथील मार्केट ही बंद राहणार आहेत.


धुळे : उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे, साक्री, पिंपळनेर बाजार समिती बंद राहणार आहे. उद्याच्या भारत बंद मध्ये हमाल मापाडी माथाडी युनियन , महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ,पुणे संपात सहभागी होणार असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री , पिंपळनेर बाजार समितीचे सर्व कामकाज बंद राहणार आहे. तर शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा बाजार समिती बंद ठेवायची का सुरु ठेवायची याबाबत व्यवस्थापनाची आज बैठक होऊन त्यात निर्णय होणार आहे.


'भारत बंद'ला अनेक पक्षांचे समर्थन


शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.


Bharat Bandh : 8 डिसेंबरला 'भारत बंद' दरम्यान काय सुरू राहणार, काय बंद?


राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.


कोणते आहेत ते तीन कायदे, ज्याचा होतोय विरोध
1. मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, 2020
2. आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, 2020
3. शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, 2020


9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?


तीन वाजेपर्यंत चक्का जाम राहील
रविवारी 'भारत बंद'च्या दिवशी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा परिस्थितीत, जर आपण या दिवशी बाहेर पडणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवांना थांबवलं जाणार नाही. याखेरीज भारत बंद दरम्यान लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दूध-फळ-भाजीच्या सेवेवर बंदी
भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे. 8 डिसेंबरला शेतकर्‍यांनी भारत बंद पुकारला आहे.