Marathwada Water News : पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात (Marathwada) म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं अनेक छोटे मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत. जायकवाडीसह (Jayakwadi) लोअर दुधना, येलदरी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा (water reservoir) झालेला नाही. त्यामुळं येत्या काळात मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते. जाणून घेऊयात मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाण्याची परिस्थिती काय?


यंदाच्या पावसाळ्याचे 73 दिवस शिल्लक आहेत. या दिवसात चागला पाऊस पडणार का? तसेच हे प्रकल्प भरणार का? असा प्रश्न निर्माण झालाय आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पात केवळ 5.60 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसानं जर जास्त ओढ दिली तर पुन्हा मराठवाड्यावर पाणीटंचाईचं संकट येऊ शकते. पावसाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. दरम्यान, सुरुवातीला काही प्रमाणात पडलेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे. या पेरणी केलेल्या पिकांना चांगल्या पावसाची गरज आहे. चांगला पाऊस नाही झाला तर दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाण्याची परिस्थिती काय?


जायकवाडी प्रकल्प 4 टक्के
लोअर दुधना 6 टक्के
येलदरी 30 टक्के


तर सिद्धेश्वर, मांजरा, माजलगाव आणि सीना कोळेगाव या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पही तळाला गेले आहेत. मराठवाड्यात एकूण 75 मध्यम प्रकल्प आहेत. छत्रपती संभाजीनगर 16, जालन्यात 7 प्रकल्प आहेत. दोन्ही जिल्ह्यातील 23 प्रकल्पात केवळ 3 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर बीडमधील 16 प्रकल्पात 9 टक्के, लातूरमधील 8 प्रकल्पात 11 टक्के, धाराशिवमधील 17 प्रकल्पात 6 टक्के, नांदेडमधील 9 प्रकल्पात 17 टक्के, परभणीत 7 प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. 


आज राज्यात कसं असेल हवामान?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, जाणून घ्या सध्याची स्थिती काय?