Mahendra Dalvi on Jayant Patil : विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाला त्यांचा स्वभाव हाच कारणीभूत असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी केला आहे. त्यांना विधानपरिषदेत जनाधार नव्हताच. त्यांनां मिळालेली मते ही लक्ष्मी दर्शन केलेली आहेत, असं खळबळजनक वक्तव्य देखील दळवी यांनी केलं आहे. 


शेकापची जनमानसात असलेली क्रेझ आता संपली


शेकाप पक्षाचा आता अंत आलेला असल्याचेही आमदार महेंद्र दळवी म्हणाले. शेकापची जनमानसात असलेली  क्रेझ आता संपलेली असल्याचेही दळवी म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा बळी जाणार हे मी अगोदरच सांगितलं होत असंही दळवी म्हणाले. त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणताही जनाधार नव्हता असं दळवी म्हणाले. दरम्यान, उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार असल्याचा इशाराही दळवी यांनी केला. गेल्या 15 वर्षांत जयंत पाटील यांनी कुटुंबा व्यतिरिक्त कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दळवी म्हणाले.


महायुतीचा 11 पैकी 9 जागांवर विजय


राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) 9 जागांवर विजय मिळवत वरचष्मा राखला होता. तर एकूण तीन जागा निवडून आणण्याचे महाविकास आघाडीचे (MVA Alliance) प्रयत्न अयशस्वी ठरले. मविआला फक्त दोन जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे दोन उमेदवार विजयी झाले होते. तर शेकापच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला होता. 


जयंत पाटील यांना किती मते पडली? कसा झाल पराभव?


जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. जयंत पाटील यांना 12.46 मतं पडली. हे पाहता जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत अनेक शक्यता व्यक्त करता येतात. एकतर जयंत पाटील यांना शरद पवार गटाची सर्वच्या सर्व 12 मतं पडली असतील. पण याचा अर्थ जयंत पाटील यांना माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेकापच्या आमदाराचेच मत मिळाले नाही. दुसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाची 10 मतं, शेकापचे 1 आणि माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराचे मत मिळाले असावे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाची दोन मतं फुटली असावीत. तिसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाची 11 आणि शेकापचे 1 अशी 12 मते जयंत पाटील यांना मिळाली असावीत. ही शक्यता गृहीत धरल्यास शरद पवार गटाचा एक आमदार फुटला असावा.


महत्वाच्या बातम्या:


Jayant Patil Vidhan Parishad Election: जयंत पाटील कसे हरले? 12 मतं कुणाची मिळाली, कुणाकुणाची मतं मिळाली नाहीत?