Marathwada Rain forecast: राज्यात सध्या जोरधारा वाढल्या आहेत. पुण्यासह, सातारा, नाशिक व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासन हायअलर्टवर आहे. दरम्यान, मराठवाड्यात लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वाऱ्यांचा वेग राहणार आहे.  परंतू पुढील पाच दिवस मराठवाड्यात पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे.


कसा राहणार मराठवाड्यात पाऊस?


पुढील पाच दिवस मराठवाड्यात हलक्या सरींचा पाऊस राहणार असून तुरळक ठिकाणी मध्यम सरी बरसणार असल्याचा अंदाज देण्यात आलाय. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात  तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.


दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी पुढील पाच दिवसांचा अंदाज x माध्यमावर पोस्ट केला आहे.






 


मराठवाड्यातील धरणे भरणार!


आज राज्यातील एकूण धरणे 62.89% भरली आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यांमधून आज सकाळपासून विसर्ग सुरू आहे. परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येणार आहे. सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91 टक्क्यांवर आहे. 


पावसाला जवळजवळ दोन महिने होत आले असले तरी मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र होतं. मागील काही दिवसात झालेल्या पावसाने धरणांच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितलं. नाशिकच्या पाच धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीतील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे. 


पुण्यात पावसाचा जोर कमी झाल्याने दिलासा





पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर (Pune Rain Update) काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र शहर परिसरातील धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्राच्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड, पुण्यातील एकता नगर परिसर गेल्या वेळी पाणी शिरलेल्या सोसायट्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांचं सुरक्षित स्थळी स्थलातंर करण्यात आलेलं आहे. धरण क्षेत्रात (Dam water) चांगलाच पाऊस झाल्याने (Pune Rain Update) धरणे 90 टक्क्यांच्या वरती गेल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येत आहे.