Marathi Sahitya Sammelan : 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडावे यासाठी खूप मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. आयोजक असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, सैनिक शाळा आणि शहरातील इतर संस्थेत काम करणारे 310 कर्मचारी मागील चार महिन्यांपासून काम करत आहेत. 1200 स्वयंसेवक त्यांच्या मार्गदर्शनात येथे कार्यरत आहेत. विविध विभागात कामे वाटून देण्यात आली आहेत.


या महाविद्यालयाच्या 36 एकर परिसरात सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी 10 ते 12 हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, सहा व्यासपीठ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी प्रत्येकी 1 हजार रसिकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर संगीतकार अजय अतुल यांची आज सांगितिक मैफल भरणार आहे. उद्या म्हणजेच 21 एप्रिल रोजी 'चला हवा येऊ द्या' चे कलाकार या व्यासपीठावर रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. यासाठी 15 हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनासाठी बारा एकर परिसरात वाहनतळ तयार करण्यात आले आहे. येथे एकाच वेळी 4 हजारांहून अधिक वाहन पार्क करता येतील. 


दिग्गजांसाठी सभामंडपात सर्व यंत्रणा कार्यरत : 


प्रत्येक व्यासपीठाच्या सभामंडपात प्रेक्षक आले तर त्यांना थंड पाण्याची सुविधा कार्यरत करण्यात आली आहे.100 पेक्षा जास्त जम्बो कुलर लावण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडपात 10 फुटावर एक पंखा बसविण्यात आला आहे. विविध सेवाभावी संस्थेमार्फत लिंबूपाण्याची सोय करण्यात येत आहे. मान्यवरांसाठी सहा ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. भोजन व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी सकाळ-संध्याकाळ मिळून 10 हजार लोकांची भोजनव्यवस्था करण्यात आली आहे.   


साहित्य संमेलनासाठी 350 साहित्यिकांसह 1000 निमंत्रित येणार आहेत. त्यांच्या निवासासाठी उदगीर 140 बिदर 30 आणि लातूर 40 रूमची सोय करण्यात आली आहे. तसेच उदगीर शहरातील विविध महाविद्यालयात रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. 'उदगीर सारख्या ग्रामीण भागात अल्प कालावधीत ही यंत्रणा उभी करणे सोपी बाब नव्हे याची आम्हाला जाणीव आहे. येणारे रसिक आमची अडचण लक्षात घेऊन सहकार्य करतील. आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत' अशी माहिती कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या :